लेख: कोणत्या बाभळीचे आंबे लोकांना आवडतील? कमळाचा मतदार घड्याळाचे बटण दाबेल?

By यदू जोशी | Published: March 22, 2024 06:08 AM2024-03-22T06:08:22+5:302024-03-22T06:10:59+5:30

घड्याळप्रेमी कमळाला साथ देईल? पंजा किंवा घड्याळवाले मतदार मशालीलाही तेवढीच पसंती देतील?

Special Article on Lok Sabha Election 2024 what will voters in Maharashtra choose among all parties | लेख: कोणत्या बाभळीचे आंबे लोकांना आवडतील? कमळाचा मतदार घड्याळाचे बटण दाबेल?

लेख: कोणत्या बाभळीचे आंबे लोकांना आवडतील? कमळाचा मतदार घड्याळाचे बटण दाबेल?

यदु जोशी, सहयोगी संपादक, लोकमत

२०१९ च्या निवडणूक काळातील वृत्तपत्रे सहज चाळत होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे खांद्याला खांदे लावून प्रचार करत होते. ठाकरे मोदींची नाही नाही ती प्रशंसा करत होते. आता त्यांनी एकमेकांवर तोफ रोखली आहे. एकनाथ शिंदे हे उद्धव यांच्या नेतृत्वाचे वारेमाप कौतुक करत होते. आता ते त्यांच्यावर सडकून टीका करत आहेत. ‘राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही, नाही म्हणजे नाही’, असे निक्षून सांगणारे फडणवीस आता अजित पवारांच्या पक्षाला सोबत घेऊन लढत आहेत. तेव्हा शरद पवार, अजित पवार यांनी राष्ट्रवादीची कमान सांभाळली होती; आता ते एकमेकांना संपवण्यासाठी निघाले आहेत.

राजकारणात कोणीही कायम मित्र नसतो आणि शत्रूही नसतो हे खरे; पण गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या राजकारणाचे सर्वपक्षीय नेत्यांनी पार तीनतेरा वाजवले. भूमिका तीनशे साठ अंशात बदलल्या; प्रत्येकाकडे त्याचे समर्थन आहे; पण ते मतदारांच्या किती पचनी पडले, याचे उत्तर निवडणुकीच्या निकालातून मिळणार आहे. वैचारिकदृष्ट्या परस्परविरोधी असलेले दोन पक्ष एकत्र आले, घोटाळ्यांचे आरोप ज्यांच्यावर हयातभर केले त्यांच्या मांडीवर शिवसेना अन् भाजप दोघेही जाऊन बसले. काँग्रेस, राष्ट्रवादीनेही तेच केले. या चारही पक्षांच्या नेत्यांनी आपल्या सोयीसाठी बाभळीच्या झाडाला आंबे लावून घेतले; पण कोणत्या बाभळीला लावलेले आंबे लोकांना आवडले, याचे उत्तर आता ४ जूनला मिळेल. लोक प्रामुख्याने या चारच पक्षांना किंवा त्यांनी समर्थन दिलेल्यांनाच मतदान करणार आहेत, हे स्पष्ट आहे. राजकीय पक्षांच्या मैत्रीचे कोणते कॉम्बिनेशन मतदारांना भावले आणि कोणते भावले नाही, याचा फैसला होईल. 

आता चौघांत पाचव्याची भर पडते आहे. कमळाबाई म्हणून अनेकदा भाजपला हिणवणारे राज ठाकरे भाजपच्याच मांडीवर जाऊन बसले आहेत. ‘लाव रे तो व्हिडीओ’ एपिसोड आठवला की, ‘खरे राज कोणते?’ हा प्रश्न पडतोय. जाऊ द्या, कुछ यादे अच्छी नहीं होती.. राज यांना त्यांच्या गतकाळातील वक्तव्यांची आठवण करून दिल्यास ते आवडणार नाही. तशीही  मनाविरुद्ध काही ऐकण्याची त्यांची तयारी नसते. त्यांनी घेतलेल्या भूमिकांचे जोरदार समर्थन त्यांच्याकडे आधीच उपलब्ध असते. भाजपबरोबर राज यांचा संसार किती काळ टिकेल? 

लग्न टिकते. कारण त्याला समाजमान्यतेची चौकट असते. लिव्ह इन रिलेशनशिप टिकण्याबद्दल जरा शंका असते. हल्ली लिव्ह इनचे प्रस्थ वाढले आहे; पण त्याला समाजमान्यता मिळालेली नाही. अनेक गमती-जमती पाहायला मिळतील यावेळी. पंकजा मुंडेंसाठी धनंजय मुंडे मते मागतील, हसन मुश्रीफ म्हणतील, मोदींचे हात बळकट करण्यासाठी कमळाला मत द्या, चंद्रकांतदादा पाटील सुनेत्रा वहिनींना जिंकवण्याचे आवाहन करतील, अजितदादा भाजपच्या विजयासाठी झटताना दिसतील. मोदींची नक्कल करणारे छगन भुजबळ ‘मोदींच्या हाती देश द्या’ म्हणतील. एकेकाळी काँग्रेसचे कपडे फाडणारे उद्धव ठाकरे काँग्रेसचे गोडवे गातील. वर्षानुवर्षे ठाकरे परिवाराला लक्ष्य करणारे काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंचे गुणगान गातील. सध्या सर्वच प्रमुुख पक्षांचे नेते दोन कारणांमुळे धास्तावलेले आहेत. गेल्या पाच वर्षांत आपण दोस्त-दुष्मन बदलले ते लोकांच्या किती पचनी पडले आणि लोक ते स्वीकारून आपल्याला मतदान करतील का, ही ती धास्ती आहे. दुसरी धास्ती ही देखील आहे की, आपण तर एकत्र आलो; पण आपले मतदार मित्रपक्षांच्या उमेदवारांना  ‘व्होट ट्रान्सफर’ करतील का? 

महायुतीमध्ये ही भीती भाजपला आणि राष्ट्रवादीला अधिक आहे. कमळाचा परंपरागत मतदार घड्याळाचे बटण दाबेल का? घड्याळप्रेमी कमळाला साथ देईल का? पंजा किंवा घड्याळाचे बटण दाबत आलेला मतदार यावेळी मशालीलाही तेवढीच पसंती देईल का? राजकीय पक्षांनी तत्त्वे गुंडाळली, आता ते आपल्या मतदारांनाही तसे करायला सांगत आहेत. 

भाजपची अडचण वेगळीच आहे. त्यांच्या यंत्रणेने गेल्या सहा-आठ महिन्यांत महाराष्ट्रात अनेकदा सर्वेक्षण केले. शिवसेनेच्या तेरापैकी सात ते आठ खासदार पुन्हा निवडून येऊ शकणार नाहीत, असे त्यात समोर आले; पण त्यातील एक-दोन अपवाद वगळता एकनाथ शिंदे हे विद्यमान खासदारांनाच संधी देतील, असे दिसते. त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता आहे; पण शिंदेंचे उमेदवार स्वीकारण्याशिवाय पर्यायही नाही. बुलढाण्यासह पाच-सहा ठिकाणी भाजप हतबल झाला आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपसाठी बैठका सुरू केल्या आहेत. १० मार्चला एकाच दिवशी देशभरात संघ आणि भाजपसह संघपरिवारातील ३६ संघटनांच्या जिल्हानिहाय बैठका झाल्या. कलम ३७०, सीएए, राममंदिर या आपल्यासाठी महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांवर मोदी सरकारने निर्णय घेतले. 

आता अन्य मुद्यांसाठीही राष्ट्रीय विचारांचे सरकार आणायचे आहे, असे म्हणत संघ पदाधिकाऱ्यांनी या बैठकीत मोदींना तिसरी संधी देण्यासाठीची पेरणी परिवारात केली. जिल्ह्यानंतर आता समन्वयाच्या तालुकानिहाय बैठका सुरू झाल्या आहेत. संघ, भाजपचे असे मायक्रो प्लॅनिंग असते.

Web Title: Special Article on Lok Sabha Election 2024 what will voters in Maharashtra choose among all parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.