मुल्लानपूर येथे खेळल्या गेलेल्या हाय-स्कोअरिंग सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाबचा पराभव करून त्यांची विजयी घौडदौड रोखली. या विजयासह राजस्थानच्या संघाने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. तर, पंजाबच्या नावावर लाजीरवाणा विक्रम नोंदवण्यात आला आहे. राजस्थानने २०० किंवा त्यापेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. याउलट, २००+ धावा उभारूनही सर्वाधिक वेळा पराभूत होणाऱ्या संघाच्या यादीत पंजाबचा अव्वल स्थानी पोहोचला आहे.
दरम्यान, २०० किंवा त्याहून अधिक धावांचा पाठलाग करण्याच्या बाबतीत राजस्थान रॉयल्सने आता मुंबई इंडियन्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. या विजयासह राजस्थानने आयपीएल इतिहासात ६ वेळा २००+ धावसंख्येचा यशस्वी पाठलाग करण्याचा पराक्रम केला. या प्रक्रियेत त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद (५ विजय) यांना मागे टाकले. तर, पंजाब किंग्सच्या नावावर मात्र एक अत्यंत लाजिरवाणा विक्रम नोंदवला गेला. पंजाबने आतापर्यंत ८ वेळा २०० + धावसंख्या उभारूनही पराभव पत्करला आहे, जो आयपीएलमधील कोणत्याही संघासाठी सर्वाधिक आहे. यापूर्वी हा विक्रम ७ पराभवांसह आरसीबीच्या नावावर होता.
कर्णधार रियान परागचे विधान
विजयानंतर बोलताना राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग म्हणाला की, "आम्ही या सामन्याकडे कोणत्याही दडपणाशिवाय, एका सामान्य सामन्याप्रमाणेच पाहिले. परिस्थितीचा जास्त विचार करण्यापेक्षा आम्ही आमच्या रणनीतीवर आणि स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवला. हेच आमच्या यशामागचे कारण आहे."
स्पर्धेत रंगत वाढली
या विजयामुळे राजस्थान रॉयल्सचा आत्मविश्वास उंचावला असून गुणतालिकेतही त्यांना मोठा फायदा झाला आहे. पंजाबची विजयी घोडदौड रोखल्यामुळे आता आयपीएल २०२६ मधील अव्वल संघांमधील चुरस अधिकच रंजक वळणावर येऊन ठेपली आहे.