दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने अरुण जेटली स्टेडियमवरील घरच्या मैदानात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या 'करो वा मरो' लढतीत विजय नोंदवत स्पर्धेतील आव्हान कायम ठेवले. या विजयासह ते स्पर्धेत टिकून असले तरी प्लेऑफ्सचं तिकीट मिळेल याची खात्री नाही. आता यंदाच्या हंगामातील खराब कामगिरीसाठी दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने थेट ऑस्ट्रेलियाला जबाबदार धरले आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात हिरो ठरलेला मिचेल स्टार्क उशिरा संघात सामील झाल्याचा फटका बसला, असे दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाने म्हटले आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? क्रिकेट ऑस्ट्रेलियामुळे दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीची वाट कशी लागली? जाणून घेऊयात सविस्तर
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
दिल्ली कॅपिटल्सच्या कोचचा क्रिकेट ऑस्ट्रेलियावर निशाणा
दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील सामन्यात दोन्ही संघांनी मिळून जवळपास ४०० धावा केल्या. राजस्थानच्या संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १४ षटकांत २ बाद १६१ धावा केल्या होत्या. पण डेथ ओव्हर्समध्ये स्टार्कच्या भेदक माऱ्यामुळे राजस्थानचा संघ १९३ धावांपर्यंतच मजल मारू शकला. त्याने ४० धावा खर्च करत ४ विकेट्स घेतल्या. हा मॅचचा टर्निंग पॉइंट ठरला. हाच संदर्भ देत दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी अप्रत्यक्षरित्या क्रिकेट ऑस्ट्रेलियावर निशाणा साधला आहे.
DC vs RR: विक्रमी अर्धशतकानंतर रियान परागचा रुबाब; सेलिब्रेशनमुळे नवा वाद, नेमकं काय घडलं?
नेमकं काय म्हणाले दिल्ली कॅपिटल्सचे कोच?
राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यानंतर हेमांग बदानी यांनी मिचेल स्टार्क उशिरा संघात सामील झाल्याच्या मुद्यावर भाष्य करताना ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावर निशाणा साधला "मला माझे सर्व खेळाडू पहिल्या दिवसापासून उपलब्ध हवे असतात. स्टार्क आमच्या संघातील सर्वात महत्त्वाच्या खेळाडूंमधील एक आहे. आम्ही त्याच्यावर मोठी गुंतवणूक केली कारण तो सामना जिंकून देणारा खेळाडू आहे. पण काही निर्णय क्रिकेट बोर्ड आणि असोसिएशन्स घेतात. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने जर खेळाडू रिलीज केला नाही, तर प्रशिक्षक किंवा फ्रँचायझी फार काही करू शकत नाही." त्यांचे हे वक्तव्य दिल्ली कॅपिटल्स संकटात सापडण्याला ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्ड जबाबदार आहे, असे चित्र निर्माण करणारे आहे.
मिचेल स्टार्क किती सामने खेळला? कशी राहिली त्याची कामगिरी?
मिचेल स्टार्क हा दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर होता. आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या पहिल्या सामन्यातून त्याने पुनरागमन केले. या सामन्यात त्याने ३ विकेट्स घेतल्या होत्या. पण त्यानंतर चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात तो विकेट लेस राहिला. पंजाब किंग्स विरुद्धच्या सामन्यातही तो आपल्या गोलंदाजीची धमक दाखवू शकला नव्हता. पण राजस्थान विरुद्ध पुन्हा त्याने ४ विकेट्स घेत आपले तेवर दाखवले. यंदाच्या हंगामात स्टार्कने ५ डावांत ९ विकेट घेतल्या असून त्याची सरासरी २२ आणि इकॉनॉमी १०.४२ इतकी आहे. जर तो पहिल्या सामन्यापासून उपलब्ध असता तर दिल्ली कॅपिटल्सचा संकटात सापडण्याची वेळ आली नसती, असे मतच कोचनं व्यक्त केले आहे.