IPL 2026 Cricketers Will No Longer Be Able To Take Their Girlfriends To Team Hotels : आयपीएल २०२६ स्पर्धेदरम्यान काही खेळाडू मैदानावरील कामगिरीपेक्षा मैदानाबाहेरील ‘प्रेमाच्या खेळा’मुळे अधिक चर्चेत आले आहेत. खेळाव्यतिरिक्त IPL फ्रँचायझी आणि खेळाडूंसंदर्भात रंगणाऱ्या अवास्तव चर्चांना लगाम घालण्यासाठी बीसीसीआय आता नवी नियमावली लागू करण्याच्या तयारीत आहे. यंदाच्या हंगामात काही खेळाडूंच्या वर्तनात अनियमितता आढळून आल्याचे सांगत, यासंदर्भात लवकरच मार्गदर्शक सूचना जारी करण्यात येणार असल्याचे बीसीसीआय सचिव देवजित सैकिया यांनी स्पष्ट केले. नियमाचे पालन न करणाऱ्या खेळाडूंवर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
नियम न पाळणाऱ्या खेळाडूंवर कारवाई होणार?
आयएएनएस वृत्तसंस्थेनुसार, देवजित सैकिया म्हणाले आहेत की, "काही फ्रँचायझी संघ आणि खेळाडूंच्या वर्तनात अनियमितता दिसून आली आहे. संघाशी संबंधित नसलेले लोक खेळाडूंसोबत टीम बसमधून प्रवास करताना आणि टीम हॉटेलमध्ये वास्तव्यास असल्याचे दिसून आले आहेत. आम्ही सर्व फ्रँचायझी आणि खेळाडूंसाठी नियमावली जाहीर करणार आहोत. काही ठराविक नियम आहेत आणि त्यांचे पालन न झाल्यास BCCI योग्य ती कारवाई करेल."
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
बस आणि हॉटेलमध्ये खेळाडूंच्या गर्लफ्रेंडला नो एन्ट्री
IPL दरम्यान काही खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंड्ससोबत टीम बसमध्ये आणि टीम हॉटेलमध्ये दिसल्यानंतर चर्चेत आला आहे. त्यामुळे BCCI सचिवांचा इशारा अप्रत्यक्षपणे खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स किंवा इतर संबंधित व्यक्तींविषयी असल्याचे मानले जात आहे. सध्या IPL मध्ये खेळाडूंनी गर्लफ्रेंडसोबत हॉटेलमध्ये राहू नये असा कोणताही स्पष्ट नियम नाही. पूर्वी IPL सामन्यांदरम्यान गर्लफ्रेंड्सना खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी नव्हती. मात्र अलीकडे अनेक खेळाडू त्यांच्या पार्टनर्ससोबत प्रवासासोबतच हॉटेलमध्ये वास्तव्य करत असल्याचे दिसून आले आहे.
हे देखील आहे निर्बंध घालण्यामागचं कारण
BCCI या प्रकरणाकडे भ्रष्टाचारविरोधी दृष्टीनेही पाहत आहे. अनेक युवा भारतीय क्रिकेटपटूंच्या गर्लफ्रेंड्स सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आहेत आणि त्या विविध उत्पादनांचे प्रमोशन करतात. त्यामध्ये बेटिंग ॲप्स किंवा मद्य ब्रँड्ससारख्या BCCI नियमांविरोधातील गोष्टींचाही समावेश असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याशिवाय काही खेळाडूंनी गर्लफ्रेंड्सना भेटण्यासाठी फ्रँचायझीच्या बसचा गैरवापर केल्याचेही समोर आले आहे. हे आचारसंहितेचे उल्लंघन मानले जात असून BCCI आता याबाबत अधिक कठोर भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचे दिसते.