India vs England Test Series : आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सांगता झाल्यावर २० जून पासून भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावरील कसोटीसाठी मैदानात उतरणार आहे. टी-२० मधून थेट कसोटीत धमक दाखवण्याचे मोठे चॅलेंज टीम इंडियातील खेळाडूंसमोर असेल. भारतीय संघाचा नवा कर्णधार शुबमन गिलसाठी हा दौरा नेतृत्वाची कसोटी ठरेल. या दौऱ्यासाठी गिलशिवाय रिषभ पंतवर उप कर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आलीये. कसोटीत टीम इंडियाच्या नव्या पर्वाला सुरुवात होण्याआधी एक नजर टाकुयात इंग्लंड दौऱ्यावर भारतीय संघाला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधारांच्या खास रेकॉर्ड्सवर...
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकणं विराट-धोनीलाही नाही जमलं
महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांनी कसोटी क्रिकेटमध्ये विशेष छाप सोडलीये. पण इंग्लंडमध्ये या दोन्ही दिग्गजांना एकही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे शुबमन गिलसाठी किती मोठे चॅलेंज असेल याची कल्पना करता येईल. इंग्लंड दौऱ्यावर भारताकडून फक्त ३ कर्णधारांनी कसोटी मालिका जिंकून दाखवलीये.
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
या ३ दिग्गजांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मारलंय इंग्लंडच मैदान
भारतीय संघाने इंग्लंडच्या मैदानात पहिला कसोटी सामना हा १९३२ मध्ये खेळला. या सामन्यात भारतीय संघाला १५८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व हे सीके नायडू या दिग्गजाने केले होते. १९३२ पासून आतापर्यंत भारतीय संघाने इंग्लंडमध्ये फक्त तीन वेळा तेही वेगवेगळ्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली कसोटी मालिका जिंकलीये. यात अजित वाडेकर, कपिल देव आणि राहुल द्रविड या दिग्गजांनी टीम इंडियाचे नेतृत्व केले होते.
टीम इंडियाने कोणत्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली कधी जिंकली कसोटी मालिका?
१९७१ मध्ये भारतीय संघाने पहिल्यांदा इंग्लंडच्या मैदानात कसोटी मालिका जिंकून दाखवली. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व हे अजित वाडेकर यांच्याकडे होते. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने १-० असा विजय मिळवला होता. मालिकेतील दोन सामने अनिर्णित राहिल्यावर अखेरच्या सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला होता. भागवत चंद्रशेखर या दिग्गज गोलंदाजाने ८ विकेट्स घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. १९८६ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ सामन्यांची कसोटी मालिका २-० अशी आपल्या नावे केली होती. या कसोटी मालिकेत दिलीप वेंगसरकर यांनी सर्वोत्तम कामगिरी बजावली होती. २००७ मध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इंग्लंडमध्ये अखेरची कसोटी मालिका जिंकली होती. ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिले दोन सामने अनिर्णित राहिल्यावर तिसऱ्या सामन्यात झहीर खानने केलेल्या कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने दमदार विजय नोंदवला होता. या सामन्यात झहीर खान याने दोन्ही डावांत मिळून ९ विकेट्स घेतल्या होत्या.