EV Demand in India: भारतात आता नवीन वाहन खरेदी करताना ग्राहक केवळ त्याचा लूक किंवा ब्रँड पाहत नाहीत, तर त्या गाडीचा दैनंदिन आणि महिन्याचा खर्च किती येईल, याला सर्वाधिक प्राधान्य देत आहेत. पेट्रोल आणि डिझेलच्या सातत्याने वाढणाऱ्या किमतींमुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. अशा परिस्थितीत, इलेक्ट्रिक व्हेइकल्स हा ग्राहकांसाठी एक स्मार्ट आणि पैसे वाचवणारा उत्तम पर्याय म्हणून समोर येत आहे.
विशेषतः तरुण वर्ग, रोज ऑफिसला जाणारे नोकरदार आणि डेली ट्रॅव्हल करणाऱ्या ग्राहकांचा कल आता इलेक्ट्रिक स्कूटर आणि कार खरेदी करण्याकडे वेगाने वाढू लागला आहे.
भविष्याची नाही, तर आजची गरज..!
काही वर्षांपूर्वीपर्यंत लोक EV खरेदी करताना फार विचार करत होते. मात्र, कमी चार्जिंग खर्च, अत्यंत कमी मेंटेनन्स आणि प्रगत तंत्रज्ञानामुळे EV मार्केट आता भारतीय बाजारपेठेत पाय रोवत आहे. ग्राहकांसाठी हा केवळ एक 'ट्रेंड' राहिला नसून, ती काळाची गरज बनली आहे. मुख्यतः शहरांमध्ये दररोज प्रवास करणारे नोकरदार आणि ई-कॉमर्स डिलिव्हरी क्षेत्राशी संबंधित लोक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर करत आहेत.
चार्जिंग नेटवर्क आणि फास्ट चार्जिंगमुळे वाढला विश्वास
सुरुवातीच्या काळात ग्राहकांच्या मनात ईव्हीच्या बॅटरी रेंज आणि चार्जिंग स्टेशनबाबत अनेक शंका होत्या. मात्र, आता हे चित्र वेगाने बदलले आहे. ग्राहकांची वाढती मागणी लक्षात घेऊन ऑटोमोबाईल कंपन्याही नवनवीन मॉडेल्स लॉन्च करत आहेत, ज्यामध्ये उत्तम बॅटरी बॅकअप आणि जास्त 'रेंज' दिली जात आहे. याशिवाय, मोठ्या शहरांसोबतच आता प्रमुख हायवेवरही चार्जिंग स्टेशन्सचे जाळे निर्माण झाले आहे, ज्यामुळे लांबच्या प्रवासाची भीती दूर झाली आहे.
