"शिंदेंचे माझ्या शहरात खासदार, पाच आमदार, पालकमंत्री; तरीही आम्ही ३३ जागा जिंकल्या", इम्तियाज जलील काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 23:08 IST2026-01-24T23:06:26+5:302026-01-24T23:08:40+5:30
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सत्तेत असूनही शिंदेसेनेला चांगली कामगिरी करता आली नाही. याच मुद्द्यावरून एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना डिवचले.

"शिंदेंचे माझ्या शहरात खासदार, पाच आमदार, पालकमंत्री; तरीही आम्ही ३३ जागा जिंकल्या", इम्तियाज जलील काय बोलले?
काही लोकांना या गोष्टींचा त्रास होतोय की, एमआयएमचे १२५ नगरसेवक कसे निवडून आले आहेत? त्यांच्या हिरवा संपवण्याच्या नादात आमच्यासोबत निळा आणि भगवाही येत आहे. त्यामुळेच आम्ही छत्रपती संभाजीनगर महापालिकेमध्ये ३३ जागा जिंकल्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माझ्या शहरात एक खासदार, पाच आमदार, एक पालकमंत्री, तरीही ते १३ जागाच जिंकले, असे सांगत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष जलील यांनी शिंदेंना डिवचले.
इम्तियाज जलील नवनीत राणांच्या विधानांचा उल्लेख करत म्हणाले, "मी त्यांचे एक विधान ऐकलं आहे की, या देशात जर राहायचं असेल, तर फक्त भगवा आणि निळा चालेल. यांना तर निळा पण चालत नाही. भाजपाला निळाही चालत नाही. ते विचार करत आहेत की, आधी हिरव्याला संपवू मग निळ्यावर येऊ. त्यांचे षडयंत्र, त्यांचे कटकारस्थान हेच आहे. पण त्यांना माहिती नाही की, हिरव्याला संपवण्याच्या प्रयत्नात निळाही आमच्यासोबत जोडला गेला आहे. आता भगवाही आमच्यासोबत येत आहे."
"ज्या एकनाथ शिंदेंचा तुम्ही उल्लेख केला. त्यांचा माझ्या शहरात एक खासदार, पाच आमदार, एक पालकमंत्री. आम्ही ३३ जागा जिंकल्या आणि त्यांनी १३ जागा जिंकल्या आहेत", असे जलील म्हणाले.
ठाण्यातून खासदार जिंकवून आणण्याची इच्छा
एमआयएमची ठाण्यात ताकद वाढली आहे, मग एमआयएम ठाणे ग्रामीणमधून आमदार निवडून आणाल का?, असा प्रश्न इम्तियाज जलील यांना विचारण्यात आला होता. ते म्हणाले, "इच्छा तर आहे. आमदार काय खासदाराचाही विचार आहे. काय आहे की, एकदा विजय मिळाल्यानंतर तुमचाही आत्मविश्वास वाढतो. आतापर्यंत आमच्याकडे तरुणाई होती. आता आमच्यासोबत व्यावसायिक आणि चांगले लोक जोडले जात आहेत. समाजवादी पक्षाचे मोठेमोठे नेते एमआयएमसोबत जोडले गेले आहेत.
शिंदे ठाणे भगवे आहे म्हणतात, तेव्हा उल्लंघन होत नाही?
"एकनाथ शिंदे असे म्हणत असतील की संपूर्ण ठाणे भगवे आहे. ते कायद्याच्या चौकटीत बसते. मग मी जर मुंब्रा हिरवा आहे म्हटलं तर त्यात कायद्याचे उल्लंघन झाले आणि देशात कोणताही गंभीर प्रश्न उरलेला नाहीये. मागील दोन-तीन दिवसांपासून टीव्ही सुरू केला की, मुंब्रा, हिरवा याशिवाय दुसरा मुद्दाच राहिलेला नाही. एकनाथ शिंदेंबद्दल मी जर बोललो तर त्यांनाही त्रास होईल. पण, मी त्यांना सांगू इच्छितो की भाजपा तुम्हाला कधी उचलून फेकणार आहे, याची वाट बघा", अशी टीका जलील यांनी शिंदेंवर केली.