उल्हासनगरात वंचित आणि अपक्षांच्या बळावर शिंदेसेनेने गाठली मॅजिक फिगर? किंगमेकर कोण ठरणार?
By सदानंद नाईक | Updated: January 20, 2026 07:25 IST2026-01-20T07:24:05+5:302026-01-20T07:25:17+5:30
सत्तास्थापनेसाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. ही मॅजिक फिगर भाजप व शिंदेसेनेला गाठता आलेली नाही.

उल्हासनगरात वंचित आणि अपक्षांच्या बळावर शिंदेसेनेने गाठली मॅजिक फिगर? किंगमेकर कोण ठरणार?
सदानंद नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, उल्हासनगर: महापौर पदासाठीची उल्हासनगरमध्ये चुरस वाढली असून, वंचित बहुजन आघाडीचे दोन नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेविकेने पाठिंबा दिल्याने शिंदेसेनेने बहुमताचा ४० चा आकडा गाठल्याचे चित्र दिसत आहे. दुसरीकडे भाजपनेही हार मानलेली नसून, पडद्यामागे राजकीय हालचालींना वेग आला आहे. ७८ जागांसाठीच्या निवडणुकीत सत्तास्थापनेसाठी ४० नगरसेवकांची गरज आहे. ही मॅजिक फिगर भाजप व शिंदेसेनेला गाठता आलेली नाही.
भाजपचे ३७, तर शिंदेसेना आणि ओमी टीमचे ३६ नगरसेवक निवडून आले आहेत. भाजपला बहुमतासाठी ३, तर शिंदेसेना आणि ओमी टीमला ४ जागा कमी आहेत. साई पक्ष (१), शिंदेसेना समर्थक अपक्ष (१), वंचित बहुजन आघाडी (२), अपक्ष (१) अशा पाच नगरसेवकांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमक्ष शिंदेसेनेला पाठिंबा जाहीर केला. तर काँग्रेसच्या एका नगरसेवकाने तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला आहे.
वंचित आणि अपक्ष ‘किंगमेकर’
शिंदेसेनेने राजकीय कौशल्याने अपक्ष आणि वंचितच्या नगरसेवकांना आपल्या गोटात घेण्यात यश मिळवले. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते सोनू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेवक विकास खरात आणि सुरेखा सोनावणे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा जाहीर केला.
अपक्ष, साई पक्ष निर्णायक
अपक्ष नगरसेविका सविता तोरणे-रगडे यांनी ओमी कलानी आणि शिवाजी रगडे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेला पाठिंबा दिला. तसेच साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनीही शिंदेसेनेसोबत राहण्याचा निर्णय घेतला. यामुळे शिंदेसेनेची संख्या ४० वर पोहोचली.
आमचाच महापौर : भाजप
महापालिकेत सर्वाधिक ३७ जागा जिंकून मोठा भाऊ म्हणून भाजप पुढे आला आहे. महापौर पदावर पहिला अधिकार आमचा आहे. बहुमतासाठी ४० ची मॅजिक फिगर गाठून आमचा महापौर होणार असल्याचा दावा भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी सांगितले.
भाजपची ‘वेट अँड वॉच’ भूमिका
शिंदेसेनेने बहुमताचा आकडा गाठल्याचा दावा केला असला तरी, भाजप अजूनही शर्यतीत आहे. केवळ ३ नगरसेवक कमी असल्याने भाजपकडून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेवकांशी संपर्काचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
भाजपने शेवटच्या क्षणी काही नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्यात
यश मिळवले तर गणिते बदलू शकतात.