‘वेळ पडल्यास आम्हीदेखील वेगळा विचार करू शकतो’; भाजपची अप्रत्यक्ष विरोधी बाकावर बसण्याची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2026 07:00 IST2026-01-18T05:55:16+5:302026-01-18T07:00:23+5:30
महापालिकेवर अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते

‘वेळ पडल्यास आम्हीदेखील वेगळा विचार करू शकतो’; भाजपची अप्रत्यक्ष विरोधी बाकावर बसण्याची तयारी
ठाणे : येथील महापालिका निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या यशानंतर भाजपची जबाबदारी अधिक वाढली असल्याचे मत भाजपचे आ. संजय केळकर यांनी व्यक्त केले.
‘कार्यकर्त्यांच्या अपेक्षेनुसार पक्षाने ठाण्यातील सर्व १२५ जागांवर निवडणूक लढवली असती, तर राज्यात ज्या ठिकाणी चित्र दिसले, तेच चित्र ठाण्यातही दिसले असते. मात्र, आता जर-तरचा विचार करण्यात अर्थ नाही. महापालिकेवर अंकुश ठेवणारी एक शक्ती लागते. तेव्हा विचार पडला, तर वेगळा करू शकतो’, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी बाकावर बसण्याची तयारीही अप्रत्यक्षपणे त्यांनी यावेळी स्पष्ट केली.
ठाण्यात भाजपच्या विजयी उमेदवारांच्या उपस्थित पत्रकार परिषदेत शनिवारी केळकर बोलत होते. यावेळी आ. निरंजन डावखरे, माधवी नाईक, ठाणे शहराध्यक्ष संदीप लेले आदी मान्यवर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
नियंत्रण ठेवणारी एक सक्षम शक्ती आवश्यक
ठाण्यात अनेक ठिकाणी बंडखोर आणि अपक्ष उमेदवार रिंगणात होते, तरीही मतदारांनी सूज्ञपणाची भूमिका घेत महायुतीवर विश्वास दाखविला. स्वतंत्रपणे लढलो असतो, तर भाजपचा मतांचा टक्का अधिक वाढला असता, असे संकेत देत त्यांनी पुढील काळात भाजप अधिक ताकदीने उभा राहील, असेही स्पष्ट केले. महापालिकेतील कारभारावर लक्ष ठेवण्याबाबत ते म्हणाले की, आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी वेळ पडल्यास भाजप स्वतंत्र भूमिका घेऊन कारभारावर अंकुश ठेवेल. सत्तेच्या कारभारावर नियंत्रण ठेवणारी एक सक्षम शक्ती असणे आवश्यक आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यामुळे या वक्तव्याची आता चर्चा होऊ लागली आहे.