डाॅ. संजय जानवळे (बालरोगतज्ज्ञ)
लहान मुलांच्या जगण्याचे अवघे अवकाश ‘आई-बाबा’ या केवळ दोन शब्दांनीच व्यापून टाकलेले असते. तेच त्यांचे सर्वस्व असतात. त्यांचे ते विश्व असते. अचानक आई-बाबा विभक्त होतात आणि त्यांच्या आनंदातजगण्याला ग्रहण लागते. घटस्फोट होण्यास मीच कारणीभूत आहे किंवा त्यात माझा काहीतरी दोष आहे, अशी अपराधीपणाची भावना मुलांच्या मनात उत्पन्न होते आणि त्यांना ती सतत सतावत राहते. स्वत:लाच दोष देत ही चिमुरडी मग पालकांचे संरक्षण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात.
महाराष्ट्रात घटस्फोटाचे प्रमाण देशात सर्वाधिक असून, ते १८.७ टक्के एवढे जास्त आहे. मुंबई, पुणे अशा मेट्रो शहरात हे प्रमाण ३० टक्क्यांहून अधिक आहे.
घटस्फोट पतीपत्नीचा होतो, त्यासाठीची त्यांची कारणं त्यांच्या दृष्टीनं बरीवाईट, योग्य-अयोग्य असू शकतील; पण, त्यातून कुटुंब विभाजन होतंच. वेगळं होणं ही एक मानसिक प्रक्रियाही आहेच. घटस्फोटाचे कुटुंबावर अनेक परिणाम होतात. मात्र, मुलांवर-मुलांच्या मनावर होणारे भावनिक परिणाम काळजी वाटावे असे असतात.
त्यावेळची मुलांची भावनिक अवस्था समजून घेण्यासाठी मनाची संवेदनशीलता हवी.
१९७९ मध्ये ‘क्रेमर व्हर्सेस क्रेमर’ हा इंग्रजी चित्रपट आला होता. या चित्रपटात घटस्फोटानंतर मुलांना होत असलेले दुःख, वेदना आणि त्या वेदनेशी जुळवून घेण्याच्या प्रक्रियेतून जात असताना करावा लागत असलेला संघर्ष, याचे वास्तववादी चित्रण केले आहे.
१९९३ साली आलेल्या मिसेस डाउटफायटर या एका भावनिकदृष्ट्या अत्यंत प्रभावी चित्रपटात घटस्फोट आणि त्यानंतरच्या परिणामांचे हृदयस्पर्शी चित्रण केले आहे. कधी कधी आईवडील पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांच्या समस्या आणि अडचणींसाठी मूल जबाबदार नाही, याची जाणीव त्यांना असते. मुलांवरील त्यांचे प्रेम बदलत नाही हेच या चित्रपटातून दाखवले आहे.
मुलांवर काय परिणाम होतात?
पालकांचे विभक्त होणे किंवा घटस्फोट होणे हा मुलांसाठी एक अवघड अनुभव असतो. त्याचे वेगवेगळे परिणाम मुलांच्या मनावर होत असतात.
१. लहान मुले औदासीन्याची शिकार बनतात, तर मोठी मुले रागीट.
२. लहान मुलांना घटस्फोटानंतर परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी पालकांना मदत करावी लागेल. त्यासाठी मुलाला दोघांतही गुंतवून ठेवणे, हा सर्वांत चांगला मार्ग आहे.
३. विभक्त होणे अथवा घटस्फोटासारख्या नाजूक संवेदनशील परिस्थितीचा सामना करणे, ही कुटुंबावर आलेली अवघड वेळ असते. घटस्फोटाचे मुलांवर व मुलांच्या मनावर काय परिणाम होतील किंवा मुले त्याला कसा प्रतिसाद देतील, हा प्रश्न पालकांना, कुटुंबाला सतत भेडसावत असतो.
मुले कसा प्रतिसाद देतील हे त्या मुलाचे वय, त्याचा स्वभाव, घटस्फोटापूर्वी कुटुंबात असलेला जिव्हाळा, प्रेम आणि संवाद यावर किंवा कुटुंब कसे होते, या बाबींवर अवलंबून असते.
४. दुःखी, तणावपूर्ण प्रसंगी मुले कसा प्रतिसाद देतील, कसं वागतील हे पालक समजून घेतात का, पालकांत ती क्षमता असते का? हे त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे आहे.
५. अर्थातच घटस्फोटाचे मुलांवर होणारे परिणाम हे हानिकारक असतात. पण, अशा अवघड परिस्थितीशी मुलांना जुळवून घेण्यास मदत करणे किंवा परिस्थितीनुसार त्यांच्यात बदल घडवून आणणे, यासाठी अनेक उपाय आहेत.
६. त्यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे मुलांना कौटुंबिक कलहात आणू नये. मुलांना दोन्ही पालकांसोबत संबंध प्रस्थापित करण्याचे स्वातंत्र्य द्यावे.
घटस्फोटानंतर मुलांचा प्रतिसाद कसा असेल?
प्रत्येक मूल वेगळे असते, घटस्फोटानंतर त्यांनी दिलेला प्रतिसाद हा त्यांच्या वयानुसार, मानसिक विकासानुसार आणि स्वभावानुसार वेगवेगळा असतो.
लहान मुले (५ किंवा ५ वर्षांखालील)- ही मुलं व्यथित, दुःखी, चिडचिडी बनतात. त्यांच्यात वर्तणुकीच्या समस्या उद्भवतात. उदा. लहान मूल अगदी बाळासारखे वर्तन करू लागते.
शाळेत जाणाऱ्या मुलांत उदासीनता, नैराश्य, रागीटपणा आढळतो. घटस्फोट होणार नाही, अशी बहुतांश मुलांची आशा असते. नंतर घटस्फोट होण्यास मी कारणीभूत आहे किंवा मीच दोषी आहे, अशी अपराधीपणाची त्यांची भावना बनते. स्वत:ला दोष देत ते पालकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात.
मोठी मुलं किंवा टीनएजर्स रागीट बनतात. आईवडिलांनी निराश केले किंवा त्याचा भ्रमनिरास झाला असे त्यांना सतत वाटत राहते. घरी संघर्ष करतात, भांडत राहतात, ड्रग्ज, मदिराप्राशन अशा व्यसनांच्या जाळ्यात अडकत जातात. व्यसनाधिन होतात. शाळेतला परफाॅर्मन्स ढासळतो आणि त्यांच्यात इतर काही वर्तणुकीच्या समस्या उद्भवतात.
काय करता येऊ शकतं?
विभक्त होणे हा मुलांसाठी आणि पालकांसाठीही सर्वांत कठीण काळ असतो. मात्र, त्यांनी मुलाचा नित्यक्रम नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचा प्रयत्न करायला हवा. त्याला नियमितपणे शाळेत पाठवा. त्याला त्याच्या जिवलग मित्रांसोबत खेळू द्या. घरातील कामे करू द्या, कुठल्याही प्रकारे त्याची शिस्त बिघडू नये, याकडे कटाक्ष ठेवा.
मुलांना त्यांच्या भावना व्यक्त करू द्या. त्यात मुलाचा काहीएक दोष नाही हे स्पष्ट करा. आणि दोघांना एकत्र आणण्यासाठी तू काहीच करू शकत नाहीस, हे समजावून सांगा.
मुलांसमोर कुठल्याही परिस्थितीत तुमच्या जोडीदारावर टीका करू नका अथवा त्याच्याविषयी तक्रारी करू नका. अपमान करू नका. कारण असे वर्तन मुलांसाठी हानिकारक असते. मूल तुमचीच बाजू घेईल, अशी अपेक्षा करू नका.
घटस्फोट ही एक निरंतर चालू राहणारी प्रक्रिया असते. जसं-जसं मूल वाढत जातं, तसतसा त्याचा विकास होतो, कौटुंबिक परिस्थितीचा त्याच्यावर होणाऱ्या परिणामातही बदल होतो. त्यामुळे मुलाचे सतत समुपदेशन करणे आवश्यक असते.
