आजच्या डिजिटल युगात मोबाइल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग झाला आहे. मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही मोबाइलचे आकर्षण प्रचंड वाटते. कार्टून, गेम्स, व्हिडिओ आणि रंगीत स्क्रीन यामुळे मुलं सहज त्यात गुंतून जातात. अनेक पालकांची तक्रार असते की मुलं सतत मोबाइल मागतात, आणि न दिल्यास रडारड, चिडचिड किंवा हट्ट करतात. (Kids Not Leaving Mobile? Stop Scolding – Try This Simple Trick to Reduce Screen Time Naturally | Parenting Tips & Screen Time Control)ओरडल्यावर परिस्थिती आणखी बिघडते. अशा वेळी फक्त रागावून प्रश्न सुटत नाही, तर थोड्या समजुतीने आणि नियोजनाने वागणे गरजेचे असते.
सर्वप्रथम हे लक्षात घ्यायला हवे की मुलं आपल्याकडूनच शिकतात. घरात मोठेच सतत मोबाइल वापरत असतील तर मुलांनी तो मागणे साहजिक आहे. त्यामुळे पालकांनी स्वतःच्या मोबाइल वापरावर नियंत्रण ठेवणे ही पहिली पायरी आहे. जेवताना, गप्पा मारताना किंवा मुलांसोबत वेळ घालवताना मोबाइल बाजूला ठेवला तर मुलांनाही त्याची गरज फार भासणार नाही.
मुलांना मोबाइल देणं पूर्णपणे बंद करणे कठीण असते. त्यामुळे वापराची वेळ ठरवून द्यावी. उदाहरणार्थ, दिवसातून अर्धा तास किंवा ठराविक वेळच स्क्रीन टाइम द्यावा. वेळ संपल्यावर आधीच सांगितल्याप्रमाणे शांतपणे मोबाइल काढून घ्यावा. नियम सातत्याने पाळले तर मुलं हळूहळू ते स्वीकारतात.
मोबाइलऐवजी पर्याय देणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांना मोकळ्या जागेत खेळू देणे, चित्रकला, रंगकाम, गोष्टी सांगणे, पझल्स, खेळणी, पुस्तक वाचन अशा क्रियाकलापांमध्ये गुंतवणे गरजेचे आहे. पालक स्वतः त्यांच्यासोबत खेळले तर मुलांचा उत्साह वाढतो. अनेकदा मुलं कंटाळा आला म्हणून मोबाइल मागतात. जर त्यांना मनोरंजक आणि सर्जनशील पर्याय मिळाले तर ते स्क्रीनपासून आपोआप दूर राहतात.
मुलं चिडचिड करत असतील तर त्यांना ओरडण्याऐवजी त्यांच्या भावनांना समजून घ्या. "तुला अजून गेम खेळायचा आहे ना? पण आता आपण दुसरं काही मजेदार करूया," असे शांतपणे सांगितल्यास ते जास्त सकारात्मक प्रतिसाद देतात. रागाने बोलल्यास त्यांचा हट्टीपणा वाढतो.
झोपण्यापूर्वी किमान एक तास मोबाइल पूर्णपणे बंद ठेवण्याची सवय लावावी. स्क्रीनमधील निळा प्रकाश मुलांच्या झोपेवर परिणाम करू शकतो. त्याऐवजी झोपण्यापूर्वी गोष्ट सांगणे किंवा गप्पा मारणे हा चांगला पर्याय आहे. मुलांना सवय आपल्यामुळेच लागते, जेवताना किंवा कामात असताना शांतता मिळावी म्हणून आपण मुलांना मोबाइलशी गट्टी करायला लावतो नंतर मग ते मोबाइल सोडतच नाहीत.
