उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे फक्त फिरायला जाणे, नवनवीन ठिकाणे पाहणे किंवा सगळ्या दिवसांसाठी काहीतरी प्लॅन करणे एवढंच नसतं. हा आपल्या आणि आपल्या मुलांच्या आयुष्यातील शांत, सुंदर आणि एकमेकांना एकत्र जोडून ठेवणाऱ्या क्षणांचा काळ असतो. (Anushka Sharma's advice to parents, take your kids for 'here' during summer vacation! )आपण रोजच्या धावपळीत इतके अडकून जातो की साध्या गोष्टींचा आनंद घेणं विसरून जातो. त्यामुळे या सुट्ट्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असायला हवा. असे सांगणारा एक टेक्स्ट अनुष्का शर्माने तिच्या इस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली. वाचायला साधा वाटणारा हा मुद्दा असला तरी पालकांनी विचारात घेण्यासारखा आहे.
या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना अशा ठिकाणी घेऊन जा, जे खऱ्या अर्थाने सुंदर आहे. सुंदर म्हणजे फक्त महागडे रिसॉर्ट किंवा प्रसिद्ध पर्यटनस्थळ नव्हे, तर जिथे मनाला शांतता मिळते, जिथे जाहिरातींचा गोंगाट नाही, प्रत्येक कोपऱ्यात काहीतरी विकण्याचा प्रयत्न नाही. जिथे तुम्ही आणि तुमचं मूल निवांतपणे जगू शकता. आपण नेहमी विचारतो, "तिथे काय काय अॅक्टिव्हिटी आहेत?, कोणते खेळ आहेत." पण कधी तरी अशी जागा शोधा जिथे दिवस अॅक्टिव्हिटीने भरलेला नसतो. जिथे माणसांनी बनवलेल्या गोष्टींपेक्षा निसर्गाशी जास्त संवाद साधता येतो. झाडं, पक्षी, वारा, माती… या सगळ्यांमध्ये एक वेगळाच आनंद दडलेला असतो, जो कोणत्याही प्लॅनमध्ये सापडत नाही. मुलांना त्या मातीत खेळू द्या.
आजच्या काळात आपण कुठेही जाताना पहिली चौकशी हीच करतो की तिकडे नेटवर्क आहे का?, पण कधी तरी अशा ठिकाणी जा जिथे नेटवर्क नसतं. नकोच ते ऑनलाइन जग. सुरुवातीला थोडं विचित्र वाटेल, कदाचित कंटाळाही येईल. पण तो कंटाळा वाईट नसतो, तो आपल्या मनाचा आवाज असतो, जो आपण ऐकायलाच विसरलो आहोत. शांततेला कंटाळा समजू नका.
अशा शांततेतूनच खरे क्षण जन्म घेतात. मग तुम्हाला पक्ष्यांचे आवाज ऐकू येतील, मुलांचं मनमोकळं हसणं जाणवेल आणि कदाचित तुम्ही स्वतःही तितक्याच मनापासून हसू शकाल. या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना अशा ठिकाणी घेऊन जा, जिथे जगाचे नियम, ताणतणाव आणि अपेक्षा थोड्या वेळासाठी थांबतात. जिथे तुम्ही आणि तुमचं कुटुंब स्वतःला पुन्हा शोधू शकता. कारण शेवटी, सुट्ट्या म्हणजे फक्त फिरणं नाही… तर एकत्र वेळ घालवणं, मनाने जवळ येणं आणि आयुष्याचे छोटे-छोटे आनंद पुन्हा अनुभवणं.
