Health Tips : औषधं घेणं हल्ली रोजचं काम झालं आहे. कारण अनेकांना काहीना काही समस्या असते. घराघरांमध्ये औषधाचा एक स्पेशल बॉक्सच केलेला असतो. जास्तीत जास्त लोक कशाचाही विचार न करता गोळी उचलतात आणि पाण्यासोबत गिळतात. काही लोक गोळ्या दूध, ज्यूस, कॉफी किंवा चहासोबत घेतात. अनेकांना तर अशी सवय असते की, त्यांना आठवेल तेव्हा ते गोळ्या घेतात. पण औषध घेण्याची वेळ, पद्धत आणि कशासोबत घेता या गोष्टींचा औषधाचा प्रभाव कमी करू शकतात. जर औषधं योग्य पद्धतीने घेतली नाहीत तर त्याचा फायदा शरीराला पूर्ण मिळत नाही आणि अनेकदा तर याचे साइड इफेक्ट्सही होतात. त्यामुळे औषध घेण्याची योग्य पद्धत माहिती असणं फार महत्वाचं ठरतं.
BBC मध्ये प्रकाशित एका रिपोर्टनुसार, औषधं वेगवेगळ्या प्रकारची असतात. जसे की, टॅबलेट्स, कॅप्सूल, सिरप, पावडर, ड्रॉप्स किंवा इंजेक्शन. सामान्यपणे लिक्वीड स्वरूपात असलेली औषधं शरीरात विरघळतात आणि आपलं काम करतात. तर टॅबलेट आणि कॅप्सूलना विसरळण्यास वेळ लागतो. तर काही औषधे अशीही असतात, जी जास्त वेळ प्रभाव देण्यासाठी वेगळ्या पद्धतीने बनवली जातात. अशा गोळ्या तोडू नये, चावू नये. त्यामुळे कोणतीही औषधे डॉक्टरांनी सांगितली त्या स्वरूपातच घ्यावीत.
कशी घ्यावी औषधं?
औषधं कशासोबत घ्यावीत? असा प्रश्न अनेकांना पडतो. यावर एक्सपर्ट सांगतात की, सामान्य तापमान किंवा हलक्या कोमट पाण्यासोबत औषधं घेणं फायदेशीर मानलं जातं. थंड पाण्याने औषधं पोटात विरघळण्याची प्रक्रिया स्लो होऊ शकते. असं केल्याने औषधांचा प्रभाव उशिराने सुरू होऊ शकतो. फार जास्त गरम पाणी काही औषधांसाठी योग्य नसतं. कारण त्याने औषधांची बनावट प्रभावित होते. त्यामुळे नॉर्मल पाणी किंवा हलकं कोमट पाणी बेस्ट ठरतं.
काय करू नये?
बऱ्याच लोकांना असं वाटतं की, दूध, ज्यूस, चहा किंवा कॉफीसोबत औषधं घेणं सोपं असतं. पण ही सवय नुकसानकारक ठरू शकते. दुधातील कॅल्शिअम काही औषधांचा प्रभाव कमी करू शकतं. खासकरून थायरॉइड, कॅल्शिअम कंट्रोल किंवा अँटी-बायोटिक औषधांचा. चहा - कॉफीमध्ये कॅफीन असतं, जे काही औषधांसोबत मिळून अस्वस्थता वाढवू शकतं, हृदयाचे ठोके वाढू शकतात किंवा पोटात समस्या होऊ शकते. तर काही फळांच्या ज्यूसने सुद्धा औषधांचा प्रभाव कमी होऊ शकतो. त्यामुळे साध्या पाण्यासोबत औषधं घेणं कधीही चांगलं.
वेळही महत्वाची
औषधं घेणं जेवढं महत्वाचं आणि तेवढंच औषधं घेण्याची वेळ पाळणंही महत्वाचं आहे. काही औषधं उपाशीपोटी घ्यावी लागतात, जेणेकरून लवकर प्रभाव दिसावा. तर काही औषधं जेवणानंतर घ्यावी लागतात. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधं घेण्याच्या वेळा पाळणं खूप महत्वाचं असतं. मनात येईल तेव्हा औषधं घ्याल तर त्यांचा प्रभाव कमी होतो. खासकरून शुगर, ब्लड प्रेशर, थायरॉइड किंवा हार्टची औषधं घेण्याची वेळ पाळणं फार गरजेचं असतं. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे स्वत:च्या मनाने म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधं घेऊ नयेत.
