पुणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुण्याच्या लोकसभा २०१९ च्या रणांगणात नेमकं काय होतं '' लक्षवेधी '' ; जाणून घेऊया.. !
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 11:01 IST2019-05-23T09:28:31+5:302019-05-23T11:01:58+5:30
Pune Lok Sabha Election Results Live Vote Counting: उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत पुणे मतदारसंघातील चारही जागांवर घडलेल्या घडामोडी राजकारणाच्या फडात लक्षवेधी ठरल्या..

पुणे लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : पुण्याच्या लोकसभा २०१९ च्या रणांगणात नेमकं काय होतं '' लक्षवेधी '' ; जाणून घेऊया.. !
पुणे लोकसभेच्या चार मतदारसंघात सर्वच लढती काहींना काही कारणांनी राज्यासह देशपातळीवर चर्चेचे केंद्रस्थानी राहिले आहे.. उमेदवार जाहीर करण्यापासून ते प्रचारातील आरोप प्रत्यारोपांच्या फैरीपर्यंत पुणे मतदारसंघातील चारही जागांवर घडलेल्या घडामोडी राजकारणाच्या फडात लक्षवेधी ठरल्या..बारामतीत सुप्रिया सुळे तर मावळ मधून पार्थ पवार यांच्या द्वारे पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.पुण्यातून गिरीश बापट यांच्यासह शिरूर मधून शिवाजीराव आढळराव यांच्या लढतीकडे लक्ष लागून आहे..
'' या '' उमेदवारांच्या निकालाकडे साऱ्यांचे लक्ष लोकसभेच्या निकालावर
* ४७ लाख मतांची होणार मोजणी
* ९१६९ मतदान यंत्राचा झाला वापर
* ९३उमेदवार निवडणुकीच्या रिगणात, चौघांची होणार निवड
सुप्रिया सुळे। राष्ट्रवादी : ‘राष्ट्रवादी’च्या बालेकिल्ल्यातून तिसऱ्यांदा खासदार होण्यासाठी मोर्चेबांधणी केली. २०१४ मध्ये अनपेक्षितरीत्या मताधिक्य घटल्याने, गेल्या पाच वर्षांत पद्धतशीरपणे संपर्क वाढविला. शहरी भागातून होणारी संभाव्य पीछेहाट ग्रामीण भागातून भरून निघण्याची अपेक्षा यांना असेल.
.........
गिरीश बापट । भाजप: पक्षाची वाढलेली संघटनात्मक ताकद, स्वत:कडचे कॅबिनेटमंत्रिपद यामुळे मतदानाची टक्केवारी वाढविता आली नाही. विजयाचा विश्वास व्यक्त केला जात असला, तरी २०१४ मध्ये भाजपने मिळविलेले सव्वा तीन लाखांचे मताधिक्य राखणार की घसरणार, याचे औत्सुक्य असेल.
.
...
शिवाजीराव आढळराव। शिवसेना : खासदारकीचा चौकार मारण्यासाठी इच्छुकअसताना ऐनवेळी तगडा प्रतिस्पर्धी समोर उभा ठाकल्याने सगळी समीकरणे बदलली. अनुभवाच्या बळावर जोरदार लढत दिली खरी; पण शिरूर, हडपसर आणि भोसरीतल्या मतदारांनी किती साथ दिली, यावर निकाल ठरेल.
..........
श्रीरंग बारणे। शिवसेना : राज्यातल्या सर्वाधिक औत्सुक्याची निवडणूक लढणाऱ्या बारणेंचा विजय राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणार आहे. पराभव झाला, तर पिंपरी-चिंचवडमधले राजकारण ढवळून निघेल. हा निकाल ‘भाजप-शिवसेने’साठी प्रतिष्ठेचा आणि ‘राष्ट्रवादी’साठी अस्तित्वाचा असेल.
......
चमत्कार घडणार की अपेक्षाभंग होणार?
कांचन कुल। भाजप : बारामतीमध्ये कधी नव्हे इतकी ताकद भाजपने कुल यांच्या पाठीशी उभी केल्याने संपूर्ण राज्यात हा मतदारसंघ चर्चेत आला. तरीही विजय खेचून आणला, तर कुल ‘जायंट किलर’ ठरतील. प्रतिस्पर्धी उमेदवाराचे मताधिक्य २०१४ च्या तुलनेत कमी झाले, तरी ते भाजपसाठी यश ठरेल.
............
मोहन जोशी। काँग्रेस: आजवर कोणतीच निवडणूक न जिंकलेल्या जोशींसाठी लोकसभा निवडणुकीचे आव्हान मोठे आहे. केंद्र सरकारच्या विरोधात पुणेकरांमध्ये सुप्त लाट असून, त्या जोरावर विजयी होण्याचा विश्वास जोशींना वाटतो. तसे झाल्यास पहिला राजकीय विजय त्यांना दिल्लीत घेऊन जाईल.
.........
अमोल कोल्हे। राष्ट्रवादी : दूरचित्रवाणीवरील लोकप्रिय अभिनेता असल्याने कमी कालावधीत मतदारांपर्यंत पोहोचण्यात कोल्हे यशस्वी झाले. पक्षाची मोठी ताकद आणि प्रचारादरम्यान मतदारांनी दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे कोल्हे चमत्कार घडविणार, असे बोलले जाते.
.........
पार्थ पवार। राष्ट्रवादी: ‘राष्ट्रवादी’ हरत आलेल्या जागेवर स्वत:च्या मुलाला पहिल्याच निवडणुकीसाठी उभे करून अजित पवारांनी मोठी जोखीम उचलली आहे. शिवसेना-भाजप यांच्यातील स्थानिक पातळीवरची धुसफूस आणि शेकापची मदत यावर पार्थ यांच्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा अवलंबून आहे.
.......