काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2024 13:27 IST2024-04-29T13:24:28+5:302024-04-29T13:27:00+5:30
Lok Sabha Election: अक्षय कांती बम असं पक्षांतर करणाऱ्या मध्य प्रदेशातील इंदौर येथील काँग्रेस उमेदवाराचं नाव आहे.

काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
Congress Candidate ( Marathi News ) : सुरतमध्ये काँग्रेस उमेदवाराने अखेरच्या टप्प्यात माघार घेतल्याने बिनविरोध निवडणूक होऊन मतदानाआधीच भाजप उमेदवाराचा विजय झाला होता. त्यानंतर आता मध्य प्रदेशातही काँग्रेस उमेदवाराने ऐनवेळी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत थेट भाजपमध्येच प्रवेश केला आहे. मध्य प्रदेशातील इंदौर येथील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम असं पक्षांतर करणाऱ्या नेत्याचं नाव आहे. याबाबत भाजपचे नेते आणि मध्य प्रदेश सरकारमधील कॅबिनेट मंत्री कैलास विजयवर्गीय यांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवरून माहिती दिली आहे.
"इंदौरमधील काँग्रेस उमेदवार अक्षय कांती बम यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव आणि आमचे प्रदेशाध्यक्ष वी. डी. शर्मा यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये स्वागत," अशी पोस्ट लिहीत कैलास विजयवर्गीय यांनी अक्षय कांती बम यांच्यासोबतचा सेल्फी शेअर केला आहे.
दरम्यान, इंदौर लोकसभा मतदारसंघासाठी २५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. तसंच अर्ज मागे घेण्याची आज शेवटची तारीख होती. असं असताना काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने पक्षाला धक्का बसला आहे.
सुरतमध्येही उमेदवाराने ऐनवेळी माघार घेतल्याने काँग्रेसला फटका
सुरतची जागा बिनविरोध जिंकण्यात सत्ताधारी भाजपला यापूर्वीच यश आलं आहे. भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांचा खासदार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठही उमेदवारांनी आपले उमेदवार अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड झाली. सुरत येथील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द झाल्याने समीकरणे बदलली होती. तर बसपाचे उमेदवार प्यारे लाल भारती यांनी अर्ज मागे घेतल्याने भाजपच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले.