Diya Kumari : "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2024 16:10 IST2024-04-25T16:03:44+5:302024-04-25T16:10:53+5:30
Lok Sabha Elections 2024 Diya Kumari : दिया कुमारी यांनी घटनादुरुस्तीच्या विधानावर विरोधकांवर जोरदार प्रहार करत विरोधकांकडे कोणताही नेता नाही, धोरण नाही, ते फक्त अफवा पसरवत आहेत. कोणत्याही प्रकारची घटनादुरुस्ती केली जाणार नाही असं म्हटलं आहे.

Diya Kumari : "विरोधकांकडे ना धोरण, ना नेता, ते फक्त अफवा पसरवतात"; दिया कुमारींचं काँग्रेसवर टीकास्त्र
राजस्थान लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी कमी झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात भाजपाचे स्टार प्रचारक आपल्या उमेदवाराची बाजू भक्कम करण्यासाठी जोरदार प्रचार करत आहेत. राजस्थानच्या उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी बुधवारी भीलवाडा लोकसभेतील भाजपा उमेदवार दामोदर अग्रवाल यांच्या समर्थनार्थ रोड शो केला.
उपमुख्यमंत्री दिया कुमारी यांनी घटनादुरुस्तीच्या विधानावर विरोधकांवर जोरदार प्रहार करत विरोधकांकडे कोणताही नेता नाही, धोरण नाही, ते फक्त अफवा पसरवत आहेत. कोणत्याही प्रकारची घटनादुरुस्ती केली जाणार नाही असं म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी 26 एप्रिल रोजी मतदान होत असून बुधवारी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसचे उमेदवार डॉ. सी. पी. जोशी यांनी ग्रामीण भागात सभा घेऊन आपल्या बाजूने मतदान करण्याचे आवाहन केले.
भाजपा उमेदवार दामोदर अग्रवाल यांच्या समर्थनार्थ दिया कुमारी यांनी रोड शो केला. दामोदर अग्रवाल यांच्या समर्थनार्थ रोड शोची सुरुवात भीलवाडा शहरातील संगनेरी गेट येथील दूधधारी मंदिरापासून झाली. यानंतर रोड शो चारभुजा मंदिर, भीमगंज पोलीस ठाणे, माहिती केंद्र चौकामार्गे पोलीस नियंत्रण कक्षाजवळ पोहोचला. याच दरम्यान दिया कुमारी यांनी मीडियाला सांगितले की, "दामोदर अग्रवाल हे भाजपाचे मेहनती कार्यकर्ते आहेत. त्यांनी पक्षासाठी खूप चांगले काम केले आहे."
"भीलवाडा मतदारसंघात चांगल्या बहुमताने विजयी झाल्यानंतर दामोदर अग्रवाल लोकसभेत पोहोचून भीलवाडावासीयांची सेवा करतील." घटनादुरुस्तीबाबत विरोधकांच्या प्रश्नावर दीया कुमारी यांनी पलटवार केला आणि म्हणाल्या की, "विरोधकांकडे ना कुठला अजेंडा आहे, ना कुठलं व्हिजन, ना धोरण, ना नेता आहे. मोदींचे कार्य एक मजबूत व्हि़जन आणि विकसित भारत तयार करणे आहे."