Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 12:03 IST2024-04-30T11:49:57+5:302024-04-30T12:03:56+5:30
Lok Sabha Elections 2024 Amit Shah And Rahul Gandhi : अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे लोक उत्तर प्रदेशातून पळून गेले आहेत असं म्हणत निशाणा साधला.

Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
लोकसभा निवडणूक 2024 साठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान 7 मे रोजी होणार आहे. त्याआधी निवडणूक प्रचारात गुंतलेले पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. याच दरम्यान गृहमंत्री अमित शाह यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हे लोक उत्तर प्रदेशातून पळून गेले आहेत असं म्हणत निशाणा साधला.
"त्यांची निराशा एवढ्या पातळीवर पोहोचली आहे की ते फेक व्हिडीओ बनवत आहेत. राहुल गांधींनी जेव्हापासून पक्षाची सूत्रं हाती घेतली आहेत, तेव्हापासून ते पक्षाची पातळी खाली आणत आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निवडणूक लढवतील की नाही हे माहीत नाही, हे लोक यूपी सोडून पळून गेले आहेत. हे लोक निवडणूक लढवण्याबाबत कन्फ्यूज आहेत."
"फेक व्हि़डीओच्या माध्यमातून निवडणूक लढवत आहेत आणि फेक व्हिडीओ शेअर करत आहेत" असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. एबीपी न्यूजला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधींना वायनाडमधूनच निवडणूक लढवायची आहे.
प्रियंका गांधींना यावेळी निवडणूक प्रचारावर लक्ष केंद्रित करायचे आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिला. यावरूनच अमित शाह यांनी राहुल आणि प्रियंका यांना खोचक टोला लगावला आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर अमित शाह म्हणाले की, "काँग्रेसला खोटेपणा पसरवून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, भाजपा हा एससी/एसटी, ओबीसी आरक्षणाचा समर्थक आहे आणि त्याच्या संरक्षकाची भूमिका नेहमीच बजावेल."