मृत्यूनंतर संपत्तीमधील अर्धा वाटा सरकारचा; सॅम पित्रोदांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसनं हात झटकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 13:15 IST2024-04-24T13:14:54+5:302024-04-24T13:15:20+5:30

भाजपाकडून सॅम पित्रोदा यांच्या विधानावर प्रतिक्रिया येऊ लागताच काँग्रेस नेते पवन खेडा आणि जयराम रमेश यांनी पलटवार केला.

Congress leader Jairam Ramesh's explanation on Sam Pitroda's statement on inheritance tax | मृत्यूनंतर संपत्तीमधील अर्धा वाटा सरकारचा; सॅम पित्रोदांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसनं हात झटकले

मृत्यूनंतर संपत्तीमधील अर्धा वाटा सरकारचा; सॅम पित्रोदांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसनं हात झटकले

नवी दिल्ली -  लोकसभा निवडणुकीतील प्रचार शिगेला पोहचला आहे. त्यात मंगळसूत्र आणि वारसा संपत्ती यावरून वार पलटवार सुरू आहेत. त्यात काँग्रेस नेते सॅम पित्रोदांच्या एका विधानावरून आता काँग्रेसनं हाट झटकले आहेत. सॅम पित्रोदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यात त्यांनी अमेरिकेतील वारसा कराबाबतच्या कायद्याचं कौतुक केले. 

पित्रोदा यांच्या या विधानाचा हवाला देत काँग्रेस आपल्या देशातील धोरणं उद्ध्वस्त करू इच्छिते असा हल्लाबोल केला. त्यावर सॅम पित्रोदा यांचे हे वैयक्तिक विधान असून त्याचा पक्षाशी काहीही संबंध नाही असं काँग्रेसनं म्हटलं आहे. इंडियन ओवरसीज काँग्रेसचे अध्यक्ष सॅम पित्रोदा म्हणाले की, अमेरिकेत वारसा कर असतो, जर कुणाकडे १०० मिलियन डॉलर संपत्ती असेल त्यातील ५५ टक्के सरकार घेते आणि ४५ टक्के मृतांच्या वारसांना मिळतो. हा कायदा खूप चांगला आहे. तुमची अर्धी संपत्ती जनतेसाठी सोडावी असा उद्देश आहे असं त्यांनी सांगितले. 

भाजपाकडून सॅम पित्रोदा यांच्या विधानावर प्रतिक्रिया येऊ लागताच काँग्रेस नेते पवन खेडा यांनी पलटवार केला. पित्रोदा यांनी हे काँग्रेसचं धोरण आहे असं कुठे सांगितले का? काँग्रेसच्या जाहिरनाम्यात असं काही आहे का? असा सवाल केला. तर सॅम पित्रोदा यांना त्यांचे विचार मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. परंतु पित्रोदा यांच्या प्रत्येक मताशी काँग्रेस सहमत असेल असं नाही. लोकशाहीत प्रत्येकाला विचार मांडण्याचा हक्क आहे. मात्र भाजपा या विधानाचा वापर करून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतेय असं काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटलं. 

दरम्यान, अमेरिकेच्या वारसा कायद्याचा उल्लेख करत सॅम पित्रोदा यांनी पुढे सांगितले की, अमेरिकेसारखं भारतात आपल्याकडे असं नाही. जर एखाद्याची संपत्ती १० अब्ज असेल आणि त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या मुलांना १० अब्ज संपत्ती मिळते. मात्र जनतेला काहीच मिळत नाही. त्यामुळे अशा विषयांवर लोकांनी चर्चा करायला हवी. याचा अंतिम परिणाम काय होईल हे मला माहीत नाही असं त्यांनी सांगितले. 
 

Web Title: Congress leader Jairam Ramesh's explanation on Sam Pitroda's statement on inheritance tax