Nagpur North Election Results : उत्तरच्या गडावर काँग्रेस पुन्हा विराजमान : नितीन राऊत यांचा एकतर्फी विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 01:34 AM2019-10-25T01:34:35+5:302019-10-25T01:36:07+5:30

Nagpur North Election Results 2019 : Milind Mane Vs Nitin Raut ,Maharashtra Assembly Election 2019

 Nagpur North Election Results: Milind Mane Vs Nitin Raut | Nagpur North Election Results : उत्तरच्या गडावर काँग्रेस पुन्हा विराजमान : नितीन राऊत यांचा एकतर्फी विजय

Nagpur North Election Results : उत्तरच्या गडावर काँग्रेस पुन्हा विराजमान : नितीन राऊत यांचा एकतर्फी विजय

Next
ठळक मुद्देपहिल्याच फेरीपासून बढत

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : आंबेडकरी चळवळीचा गड असलेल्या नागपूर उत्तर या विधानसभा मतदार संघात एकेकाळी रिपब्लिकन पक्षाची एकाधिकारशाही चालायची. परंतु सलग १५ वर्षे या मतदार संघाचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. नितीन राऊत यांच्यामुळे हा काँग्रेसचा गड झाला. परंतु मागच्या निवडणुकीत मात्र त्यांना जबरदस्त धक्का बसला. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांनी उत्तरच्या या गडावर विजय मिळवला. बसपाने मारलेल्या प्रचंड मुसंडीमुळे राऊत तिसºया क्रमांकावर फेकल्या गेले होते. परंतु पाच वर्षात बरेच पाणी वाहून गेले. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांनी उत्तरचा गड पुन्हा एकदा खेचून आणला. त्यांनी तब्बल ८६८२१ मते घेत भाजपचे डॉ. मिलिंद माने यांचा २०,६९४ मतांनी पराभव केला. डॉ. माने यांना ६६,१२७ मते मिळाली.
सिव्हिल लाईन्स येथील सेंट ऊर्सुला गर्ल्स हायस्कूलमध्ये उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघाची मतमोजणी पार पडली. या मतदार संघात एकूण १८ फेऱ्या झाल्या. काँग्रेसचे नितीन राऊत यांनी पहिल्याच फेरीपासून बढत घेतली. पहिल्या फेरीत डॉ. राऊत यांना ५४८४ मते मिळाली. तर भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना ४२४७ मते पडली. अशाप्रकारे पहिल्याच फेरीत १२३७ मतांची आघाडी घेतली. चौथ्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम होती. चौथ्या फेरीपर्यंत डॉ. नितीन राऊत हे ६३०० मतांनी आघाडीवर होते. पाचव्या फेरीत मात्र भाजपचे डॉ. माने यांनी ११०० मतांची आघाडी घेतली. या फेरीत डॉ. माने यांना ५०६३ तर डॉ. राऊत यांना ३०६३ मते मिळाली. सहाव्या फेरीत पुन्हा डॉ. राऊत यांनी आघाडी घेतली. या फेरीत त्यांना ५१०९ तर डॉ. माने यांना १७२९ मते मिळाली. सहाव्या फेरीअखेर डॉ. राऊत हे ८५८० मतांनी पुढे होते. ही आघाडी दहाव्या फेरीपर्यंत कायम होती. दहाव्या फेरीअखेर डॉ. नितीन राऊत यांनी १७,८५४ मतांची आघाडी घेतली. डॉ. माने यांनी यानंतर ११ व्या, १२ व्या व १३ व्या फेरीत आघाडी घेतली. परंतु डॉ. राऊत यांची आघाडी त्यांना फार कमी करता आली नाही. अकराव्या फेरीत डॉ. माने यांना ४४२४ तर डॉ. राऊत यांना ४३८२ मते मिळाली. बाराव्या फेरीत माने यांनी तब्बल २३०५ मतांची आघाडी घेतली. या फेरीत माने यांना ६४३७ तर डॉ. राऊत यांना ४१३२ मते मिळाली. तेराव्या फेरीत माने यांना ४८८९ तर डॉ. राऊत यांना ४१२३ मते मिळाली. १४ व्या फेरीत डॉ. राऊत यांनी पुन्हा मुसंडी मारली. या फेरीत त्यांना ५१४५ मते मिळाली. तर डॉ. माने यांना २२३५ मते मिळाली. ही आघाडी १७ व्या फेरीपर्यंत कायम होती. या फेरीपर्यंत डॉ. राऊत यांनी २२,५८७ मतांनी आघाडी घेतली होती. शेवटच्या १८ व्या फेरीत डॉ. माने यांनी ६२८२ मते घेऊन आघाडी घेतली. परंतु तेव्हापर्यंत उशीर झाला होता. या फेरीत डॉ. राऊत दोन हजार मतांनी माघारले असले तरी त्यांचा विजय हा झालेला होता. डॉ. नितीन राऊत यांना विजयी घोषित करण्यात आले.

पोस्टल बॅलेटमध्येही डॉ. राऊत पुढे
पोस्टल बॅलेटमध्येही डॉ. नितीन राऊत हे आघाडीवर राहिले. एकूण ५७५ पोस्टल बॅलेट प्राप्त झाले. काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांना २४४ पोस्टल मते मिळाली. भाजपचे डॉ. मिलिंद माने यांना १४३, बसपाचे सुरेश साखरे यांना ६९, वंचित बहुजन आघाडीचे विनय भांगे यांना २९, एमआयएमच्या कीर्ती डोंगरे ४ मते मिळाली. याशिवाय कैलाश वाघमारे यांना ३, अर्चना उके १, विजया बागडे यांना १ पोस्टल मत मिळाले.

 बसपाला मतदारांनी नाकारले
उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून मागच्या वेळी बसपाचा उमेदवार हा दुसऱ्या क्रमांकावर होता. त्यांना तब्बल ५५ हजारावर मते मिळाली होती. यंदा बसपाचे प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे हे स्वत: रिंगणात होते. तरीही त्यांना केवळ २३,३३३ मतांपर्यंत मजल मारता आली.

वंचित बहुजन आघाडीपेक्षा एमआयएम वरचढ
उत्तर नागपुरात वंचित बहुजन आघाडी कि ती मते घेणार याकडे लक्ष होते. परंतु उत्तर नागपुरातील मतदारांनी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला नाकारले. या पक्षाचे उमेदवार विनय भांगे यांना केवळ ५५९९ मते मिळाली. त्या तुलनेत एमआयएमच्या उमेदवाराने मात्र चांगली मते घेतली. एमआयएमच्या उमेदवार कीर्ती डोंगरे यांनी ९२२२ मते घेतली.
जनतेने मुख्यमंत्र्यांचे नेतृत्व नाकारले : नितीन राऊत यांचा घणाघात
 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या आधीपासूनच २२० चा नारा दिला होता. परंतु, स्वत:च्या मतदार क्षेत्रात त्यांचे मताधिक्य कमी झाले असून लाखोच्या बाता करणारे मुख्यमंत्री हजारात पुढे आहे. शहरातही त्यांना अपेक्षित मताधिक्य प्राप्त झालेले नाही. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच त्यांचे नेतृत्व जनतेने नाकारले आहे, अशी टीका काँग्रेसचे राज्य कार्यकारी अध्यक्ष डॉ. नितीन राऊत यांनी केली.
नागपूर उत्तर विधानसभा मतदार संघातून ते विजयी झाले. त्यांच्या विजयाची घोषणा झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.ते म्हणाले, राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर विकास, बेरोगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या यावर न बोलता सत्ताधाºयांनी भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे नेते शरद पवार यांच्यावर इडीची चौकशी लावून दबावाचे राजकारण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, राज्यातील जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. शिवाय बहुजन नेते पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुधाकर कोहळे यांची तिकिटं कापली. त्यामुळे बहुजन समाजात असंतोष उफाळून आल्याचे दिसून येते. पाच वर्ष मुख्यमंत्रिपदी असल्याने विदर्भाचा मोठा विकास होईल, अशी सर्वांना अपेक्षा होती. परंतु, विकास तर सोडा, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्याचा रोषही निकालात दिसून आल्याचे ते म्हणाले.
राज्यात परिवर्तन घडणार
राज्यात भाजपला जनादेश मिळाला नसून जनतेने त्यांना नाकारले आहे. त्यांच्या जागाही कमी होत आहे. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येणार का? या प्रश्नावर त्यांनी राज्यात परिवर्तन होणार असल्याचे सूचक वक्तव्य केले.
पराभव आनंदाने स्वीकारतो
जनतेने दिलेला कौल मला मान्य आहे. माझा पराभव मी आनंदाने स्वीकारतो. माझ्या कार्यकर्त्यांनी सांघिकपणे परिश्रम घेतले. परंतु आमच्या हातून काही चुका झाल्या असेल म्हणूनच माझा पराभव झाला. कुठे चूक झाली याचे मूल्यमापन करूच. परंतु आमचा पराभव आम्ही स्वीकारतो. जनतेने मला केलेले मतदानाचा मी स्वीकार करतो. त्यांच्या ऋणात मी असाच राहू इच्छितो. उत्तर नागपुरातून विजयी झालेले काँग्रेसचे डॉ. नितीन राऊत यांना माझ्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.
डॉ. मिलिंद माने
पराभूत उमेदवार, भाजपा

 

Web Title:  Nagpur North Election Results: Milind Mane Vs Nitin Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.