‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 16:02 IST2024-05-05T16:01:54+5:302024-05-05T16:02:57+5:30
Maharashtra Lok Sabha Election 2024: निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.

‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
मुंबईव २६ नोव्हेंबर २००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात शेकडो सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला होता. तर काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनाही वीरमरण आलं होतं. त्यामध्ये तत्कालीन एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांचाही समावेश होता. दरम्यान, हेमंत करकरे यांचा मृत्यू हा दहशतवादी कसाबच्या गोळीने नाही तर आरएसएस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने झाडलेल्या गोळीने झाला होता, असा सनसनाटी दावा विजय वडेट्टीवार यांनी आज केला होता. त्यावरून मोठ्या वादाला तोंड फुटलं असून, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या विधानावरून विजय वडेट्टीवार यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा, असा टोला बावनकुळे यांनी लगावला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोशल मीडियावरून टीका केली आहे. त्यात बावनकुळे म्हणाले की, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा अकलेचे तारे तोडत पाकिस्तानधार्जिणी भूमिका घेतली आहे. शहीद हेमंत करकरे यांच्यावर चाललेली गोळी पाकिस्तानी दहशतवादी अजमल कसाबची नव्हती असा जावईशोध वडेट्टीवार यांनी लावला आहे. निवडणुकीत मतं मिळविण्यासाठी काँग्रेस किती खालच्या पातळीला जाणार? भाजपाला विरोध करण्यासाठी तुम्ही २६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा.
बावनकुळे पुढे म्हणाले की, जेव्हापासून नरेंद्र मोदी सत्तेत आले तेव्हापासून दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलं, पण आज काँग्रेस दहशतवाद्यांसाठी अश्रू गाळत आहेत. महाराष्ट्रात मविआ सत्तेत असताना याकुबच्या कबरीवर सुशोभीकरण केलं. आता कसाबचा पुळका आला आहे. काँग्रेस आणि विजय वडेट्टीवार यांना त्यांच्या पाकधार्जिण्या भूमिकेबद्दल जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही बावनकुळे यांनी दिला.