“अजितदादा महायुतीत आले नसते, तर आम्ही १०० जागा जिंकल्या असत्या”; शिंदेसेनेतील नेत्याचे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 18:04 IST2024-12-01T17:59:39+5:302024-12-01T18:04:38+5:30
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: एकनाथ शिंदेंनी अडीच वर्षांत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही, असे शिंदे गटातील नेत्यांनी म्हटले आहे.

“अजितदादा महायुतीत आले नसते, तर आम्ही १०० जागा जिंकल्या असत्या”; शिंदेसेनेतील नेत्याचे विधान
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आठवडाभरानंतर महायुती सरकारचा शपथविधी कधी होणार, याबाबत स्पष्टता आली आहे. राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवार, ५ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता आझाद मैदान, मुंबई येथे संपन्न होणार आहे. यानंतर आता घडामोडींना वेग आला असून, जय्यत तयारीला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीतील नेते ईव्हीएमवर पराभवाचे खापर फोडत असून, अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी लावून धरली आहे. यातच शिवसेना शिंदे गटातील नेत्यांनी एक मोठे विधान केले आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
महायुतीला मोठे बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे हे मुंबई सोडून आपल्या गावी शेतात राहण्यासाठी गेले आहेत. याबाबत उद्धव ठाकरे यांनी टीका केली होती. या टीकेला गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले आहे. जे शेतात राहतात, ते शेतात जातील, जे महालात राहतात त्यांना काय कळणार, असा टोला पाटील यांनी लगावला आहे. तसेच याच ठाकरेंचे आता निवडून आलेल्या २० आमदारांपैकी १० जण आमच्याकडे यायला तयार आहेत, असा दावा त्यांनी केला आहे. यातच अजित पवार यांच्या महायुतीतील सहभागाबाबत विधान केले आहे. यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
अजितदादा महायुतीत आले नसते, तर आम्ही १०० जागा जिंकल्या असत्या
एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षांत जनतेत मोठे नावलौकिक मिळवले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ झाला, शेतकऱ्यांचा भाऊ झाला, तरुणांचा मित्र झाला. या सर्वांचे आशीर्वाद घेऊन हा माणूस लढत आहे. एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणे योग्य नाही. आम्ही फक्त ८१-८५ जागा लढलो. अजित पवार महायुतीत आले नसते, तर त्या जागा आमच्या वाटेला मिळाल्या असत्या, तर आता शिवसेनेच्या ९० ते १०० जागा तुम्हाला दिसल्या असत्या. अजित पवार यांना सत्तेत सहभागी करून घेतले, तेव्हाही एकनाथ शिंदे यांनी त्याबाबत कधी प्रश्न विचारला नाही, असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे.
दरम्यान, शिवसेना मोठी झाली, त्यांच्या महालात आमचीही वीट आहे. त्या विटांना विसरले, संजय राऊत सारखा दगड त्यांनी आणला. या दगडाने सगळा सत्यानाश करून टाकला आहे. त्या व्यक्तीला उद्धव ठाकरेंनी ओळखावे. एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत आणि नाराज राहूही शकत नाहीत. कोणतेही खाते मागणे यात गैर काहीच नाही. यात नेत्यांमध्ये चर्चा होईल आणि निर्णय होईल. एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री व्हावे, अशी आमची इच्छा आहे, असे गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट केले.