कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2026 14:04 IST2026-01-19T14:03:03+5:302026-01-19T14:04:28+5:30
कोल्हापूरात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. पण, भाजपा आणि शिंदेसेना एकत्र येत सत्ता स्थापन करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत.

कोल्हापूरात काँग्रेस, शिंदे सेना एकत्र येण्याची शक्यता; सतेज पाटलांचे सूचक वक्तव्य
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत महायुतीचा मोठा विजय झाला. महायुतीला काँग्रेसने कडवी झुंज दिली, या निकालामध्ये महायुतीने ४५ जागा मिळवत बहुमत घेतले. भाजप २६, शिवसेना शिंदे १५, राष्ट्रवादी अजित पवार ४ अशा जागा महायुतीला मिळाल्या तर काँग्रेसला ३४, शिवसेना १ अशा जागा महाविकासआघाडीला मिळाल्या आहेत. आता महापौर पदाची चर्चा सुरू आहेत. महायुतीचा महापौर असणार हे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान, आज काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा परिषद निवडणुका आणि महापौरपदाबाबत सूचक विधान केली.
दरम्यान, कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि आमदार सतेज पाटील यांनी केलेल्या सूचक विधानामुळे खळबळ उडाली आहे. 'पडद्यामागे काय सुरू आहे, ते सध्या जाहीर करता येणार नाही', असे म्हणत त्यांनी अधिक तपशील देणे टाळले, पण त्यांच्या या विधानामुळे काँग्रेस आणि शिंदे गट यांच्यात संभाव्य युतीची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस आणि शिंदे गट एकत्र आला तर स्पष्ट बहुमत मिळू शकते, अशा चर्चा सुरू आहेत. मुंबईतील सत्ता समीकरणांवर राज्यातील इतर महापालिकांचे निर्णयही अवलंबून असल्याचे बोलले जात आहे.
राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राजकीय मोर्चेबांधणीला सुरूवात झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये महायुती विरोधात शिंदेंची शिवसेना असे चित्र आहे. यामुळे कागलमध्ये शिंदेसेनेला काँग्रेस सोबत घेऊ शकेल का? असा सवाल सतेज पाटील यांना करण्यात आला. यावेळी पाटील यांनी आज त्यावर बोलणे संयुक्तिक नाही, परवा तुम्हाला कळेल, असे सूचक विधान सतेज पाटील यांनी केले.
महापौरपदाबाबत मी आज बोलू शकत नाही. बॅकडोअरची चर्चा आम्ही पुढे आणू शकत नाही, असे सांगत ,सतेज पाटील यांनी सूचक विधान केले. अजून महापौरपदाचे आरक्षण जाहीर झालेले नाही. सध्या आम्ही महापालिकेतून जिल्हा परिषदेत गेलेलो नाही. यातच माझ्या मुलग्याचे लग्न आहे. त्यामुळे मला यावर बोलायला थोडा वेळ द्या, असंही पाटील म्हणाले.
"महानगरपालिकेत मिळालेल्या यशामुळे आता जिल्हा परिषदेसाठी चांगले वातावरण झाले आहे, असंही पाटील म्हणाले. शक्तिपीठला लोकांचा विरोध कायम आहे. तुम्ही जर चार-चारवेळा जर अलायमेंट बदलत असाल तर तुम्हाला त्याची गरज नाही, असंही सतेज पाटील म्हणाले.