संभाजी राजे व समर्थ रामदासांची भेट घडणार का?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:21 IST2018-07-12T15:19:55+5:302018-07-12T15:21:32+5:30
संभाजी महाराजांच्या आयुष्यातील दिलेरखान प्रकरण सुरू होण्यापूर्वी संभाजी राजांना सज्जनगडावर समर्थ रामदासांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आले होते.

संभाजी राजे व समर्थ रामदासांची भेट घडणार का?
‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर पोहोचली आहे. संभाजी महाराजांच्या आयुष्यातील दिलेरखान प्रकरण सुरू होण्यापूर्वी संभाजी राजांना सज्जनगडावर समर्थ रामदासांची भेट घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. असा उल्लेख अनेक पुस्तकांत आहे, तसे महाराजांचे एक पत्रही आहे. त्यामुळेच आता मालिकेत समर्थ रामदास स्वामी यांची भूमिका दिसणार का ?याविषयी समर्थ भक्तांच्या मनात मोठे कुतुहल आहे. समर्थ रामदास स्वामींच्या शिवचरित्रातील भूमिकेविषयी अनेक मतमतांतरे असल्यामुळे हा टप्पा कशा पद्धतीने पडद्यावर येणार? हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आता ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मध्ये काय पाहायला मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेच. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेने नेहमीच समज-गैरसमजांच्या पलीकडे जाऊन नि:पक्षपातीपणे खरा इतिहास दाखवला आहे. मग ते गोदावरीचं प्रकरण असो, वा कलावंतीणीचं गाणं ऐकण्याचं... या सर्व गोष्टी मोठ्या शिताफीनं हाताळत खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न या मालिकेच्या माध्यमातून होतोय. ज्याला महाराष्ट्रातून सर्वमान्यता मिळतेय. भरभरून प्रेमही मिळतंय.
डॉ. अमोल कोल्हेने या मालिकेत संभाजी राजांच्या भूमिकेत दिसतायेत. छत्रपती संभाजी राजांच्या आयुष्यावर दृष्टीक्षेप टाकला तर एक बाब प्रामुख्याने लक्षात येते ती म्हणजे लहानपणापासूनच अनेक चढ-उतार त्यांच्या आयुष्यात आले. वयाच्या दुसऱ्या वर्षी आईचे छत्र हरवले. मात्र आजी जिजाऊसाहेबांच्या सावलीत स्वराज्याचे बाळकडू त्यांना मिळाले. अवघ्या नवव्या वर्षी मिर्झाराजांच्या गोटात जाऊन स्वराज्यासाठी मोगल मनसबदार झाले. दहाव्या वर्षी आग्र्याला शहेनशहा औरंगजेबाच्या दरबारात आपल्या बाणेदारपणाने भल्याभल्यांना चकित केले. या मालिकेचे लेखन प्रताप गंगावणे यांनी केले असून मालिकेची निर्मिती डॉ. अमोल कोल्हे, विलास सावंत, सोनाली राव आणि पिंकू बिस्वास यांनी केली आहे