युद्धाच्या पलीकडली शौर्यगाथा! कसा आहे अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
By संजय घावरे | Updated: January 24, 2025 20:33 IST2025-01-24T18:25:42+5:302025-01-24T20:33:34+5:30
अक्षय कुमार-वीर पहारिया यांचा 'स्काय फोर्स' सिनेमा कसा आहे? थिएटरमध्ये जाण्याआधी घ्या जाणून

युद्धाच्या पलीकडली शौर्यगाथा! कसा आहे अक्षय कुमारचा 'स्काय फोर्स' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
पाकिस्तानसोबत लढल्या गेलेल्या युद्धकथेवर आधारलेल्या या चित्रपटात देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या एका वीर सैनिकाची युद्धाच्या पलीकडली शौर्यगाथा पाहायला मिळते. संदीप केवलानी आणि अभिषेक कपूर यांनी भारतीय वायुसेनेच्या साहस, युद्धकौशल्य आणि पराक्रमाची गाथा सादर केली आहे. रहस्य कायम राखणारा क्लायमॅक्स खूप भावूक करतो.
कथानक : १९६५मध्ये भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यात भारतीय वायुदलातील स्क्वाड्रन लीडर टी. कृष्णा विजया उर्फ टॅबी बेपत्ता होतो. ४ डिसेंबर १९७१ रोजी पाकिस्तानी युद्धकैदी सैनिक अहमद हुसेनची चौकशी करताना विंग कमांडर कुमार ओम अहुजा यांना पाकिस्तान युद्धात हरूनही अहमदला 'सितारे जूर्रत'ने सन्मानित केल्याचे समजते. तिथून कथानक १९६५मध्ये सुरू होते. ५ सप्टेंबर १९६५ रोजी पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताचे ३ पायलट शहीद होतात. त्यामुळे अहुजा व टॅबी पाकिस्तान सीमारेषेवर रेकीसाठी जातात आणि हल्ला करून परततात. दुसऱ्या रात्री पाकिस्तानने केलेल्या हल्ल्यात भारताची २८ विमाने उद्ध्वस्त होतात आणि ७ जवान शहीद होतात. ७ सप्टेंबर १९६५ रोजी भारतीय वायू सेना पाकिस्तानमधील सरगोदा एअर बेसवर एअर स्ट्राइक करते.
लेखन-दिग्दर्शन : अखेरपर्यंत रहस्य उलगडणार नाही अशा प्रकारे पटकथेची बांधणी करण्यात आली आहे. 'ऐसे सैनिक रोज रोज पैदा नहीं होते...' तसेच 'कल सुबह भारत एक नया इतिहास रचेगा...' आदी संवाद चांगले आहेत. आकाशातील फायटर प्लेन्सची दृश्ये रोमांचाक आहेत. युद्धप्रसंगांतील थरार पडद्यावर जाणवतो. देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या एखाद्या सैनिकाचा १० वर्षे शोध घेतला जात नाही ही गोष्ट कोणत्याही भारतीयाचे हृदय पिळवटणारी आहे. ही एका नायकाची गोष्ट आहे. अशा आणखी किती जवानांचा शोध घेतला नाही? असा प्रश्नही हा चित्रपट उपस्थित करतो. 'माई तेरी मिट्टी बुलाए तो...', 'क्या मेरी याद आती है...' ही गाणी चांगली झाली आहेत. कॅास्च्युम आणि गेटअपवर लक्ष देण्याची गरज होती. पार्श्वसंगीत खूप लाऊड असल्याने बऱ्याच ठिकाणी संवाद समजत नाहीत.
अभिनय : अक्षय कुमारने साकारलेला विंग कमांडर सर्वार्थाने आजवरच्या त्याच्या व्यक्तिरेखांपेक्षा वेगळा आहे. गाणी वगळता इतर कुठेही अक्षय दिसत नाही. वीर पहाडीयाने मुख्य भूमिकेत जीव ओतला आहेच, पण देशभक्ती रक्तात भिनते तेव्हा काय होते त्याचे उदाहरण त्याने सादर केले आहे. शरद केळकरची छोटीशी व्यक्तिरेखा उत्सुकता वाढवते. सारा अली खानला इमोशनल दृश्ये फुलवण्याची छान संधी होती, पण तिने ती वाया घालवली. निम्रत कौरने आपल्या वाट्याला आलेली भूमिका नीट साकारली आहे. जयवंत वाडकरांच्या वाट्याला एकच पण महत्त्वपूर्ण संवाद आहे.
सकारात्मक बाजू : पटकथा, संवाद, दिग्दर्शन, अभिनय, गीत-संगीत, अॅक्शन, सिनेमॅटोग्राफी
नकारात्मक बाजू : पार्श्वसंगीत, वेशभूषा
थोडक्यात काय तर एका योद्ध्याची यशोगाथा सांगणारा तसेच मनात देशभक्तीची ज्योत प्रज्वलीत करणारा हा चित्रपट नक्की पाहायला हवा.