Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल

By देवेंद्र जाधव | Updated: June 24, 2025 18:39 IST2025-06-24T18:28:13+5:302025-06-24T18:39:19+5:30

Panchayat 4 Review : एखादी चांगली कलाकृती पाहून संपते तेव्हा, 'अजून एखादा भाग असायला हवा होता', अशी चुटपुट मनाला लागते. 'पंचायत'च्या आधीच्या तीनही सीझन्सने हे खरंही केलंय. पण हा सीझन पाहिल्यावर ती 'चुटपुट' लागत नाही, इतकंच!

Panchayat 4 Review starring neena gupta jitendra kumar raghubir yadav faisal malik | Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल

Panchayat 4 Review : 'वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन..'; दुर्दैवाने 'पंचायत ४'विषयी हेच म्हणावं लागेल

Release Date: June 24,2025Language: हिंदी
Cast: नीना गुप्ता, जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, दुर्गेश कुमार, सान्विका, सुनिता राजवर, फैसल मलिक, चंदन रॉय
Producer: TVFDirector: दीपक कुमार मिश्रा
Duration: ८ भागGenre:
लोकमत रेटिंग्स

>> देवेंद्र जाधव

'पंचायत' वेबसीरिजचं स्वतःचं एक वैशिष्ट्य आहे. मिश्किलपणा आणि भावनिकता यांचा योग्य मिलाफ 'पंचायत'च्या तीनही सीझनमध्ये बघायला मिळाला. त्यामुळेच 'पंचायत'च्या चौथ्या सीझनबद्दल अपेक्षा, उत्सुकता आणि आतुरता होती. पण 'पंचायत ४'ने सीरिजचा चढता ग्राफ खाली आणला आहे. याशिवाय 'पंचायत'च्या दर्दी चाहत्यांची निराशा केली आहे. म्हणूनच प्रख्यात कवी-गीतकार साहिर लुधियानवींचा एक शेर इथे आठवतो.. वो अफ़्साना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन, उसे इक ख़ूब-सूरत मोड़ दे कर छोड़ना अच्छा. 

'पंचायत ४'चा मुख्य प्रॉब्लेम हा लिखाणात झाला आहे. कदाचित, कथा कुठून सुरु होईल आणि कुठे संपेल याचा कच्चा आराखडा मेकर्सच्या मनात तयार असावा. परंतु यामध्ये जे रंग भरणं आवश्यक होतं, ते फिके पडतात. त्यामुळे चित्र सुंदर होण्याची शक्यता असूनही त्यात कुठेतरी कमतरता जाणवते. आणि कॅनव्हासवरील पेंटिंग मन जिंकत नाही. भावनिक गुंतागुंत, दुःखावर मारलेली हास्याची फुंकर, व्यक्तिरेखांमधील खुलणारे नातेसंबंध अशा गोष्टी 'पंचायत' वेबसीरिजच्या यूएसपी ठरल्या. या मुख्य गोष्टींचाच 'पंचायत ४'मध्ये अभाव दिसतो. त्यामुळे 'पंचायत ४'चा पत्त्यांचा बंगला लिखाणातील उणीवांमुळे गडगडतो. कलाकारांनी त्यांच्या अभिनयाद्वारे हा कोसळलेला बंगला पुन्हा पुन्हा बांधायचा प्रयत्न केलाय. पण कथारुपी 'पाया' भक्कम नसल्याने सीरिजमधील पोकळपणा पुरेपूर जाणवतो.

कथानक:

'पंचायत ४'च्या कथानकाबद्दल सांगायचं तर, फुलेरामध्ये यंदा निवडणुकीचं वातावरण आहे. एकीकडे प्रधानजी, सचिवजी, रिंकी, प्रल्हाद, विकास ही माणसं मंजु देवी पुन्हा प्रधान व्हावी म्हणून तयारी करत आहेत. दुसरीकडे भूषणची बायको क्रांती देवी पहिल्यांदा प्रधानपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्यासाठी उत्सुक आहे. गावात 'मंजु देवी' विरुद्ध 'क्रांती देवी' असं निवडणुकीचं वातावरण दिसतं. एकमेकांपेक्षा वरचढ होण्यासाठी आणि लोकांची मनं जिंकण्यासाठी दोन्ही गटांची आपापसात स्पर्धा सुरु असते. मग शेवटी या दोघींपैकी कोण जिंकतं? या सर्व वातावरणाचा सचिवजीवर काय परिणाम होतो? याची उत्तरं तुम्हाला 'पंचायत ४'मध्ये बघायला मिळतील.

लेखन-दिग्दर्शन:

TVF च्या आजवरच्या सर्व कलाकृतींची खास गोष्ट ही आहे की, प्रेक्षक एखादी गोष्ट पाहिल्यावर आधी कहाणीला भरभरुन दाद देतो. परंतु 'पंचायत ४' ही सीरिज दुर्दैवाने याला अपवाद आहे. चंदन कुमार आणि दीपक कुमार मिश्रा या लेखक-दिग्दर्शक जोडीने प्रेक्षकांची उत्सुकता बघून हा सीझन घाईत आणलाय का? असा प्रश्न पडतो. कारण दिग्दर्शन, गाणी, संगीत यामध्ये आधीसारखी काहीच मजा नाही. सर्व उरकल्यासारखं आणि संपवल्यासारखं वाटतं. खरं म्हणजे, 'पंचायत ४'  खुलवण्यास खूप चांगला वाव होता. पण सीरिज एका मर्यादेपलीकडे पुढे जात नाही. वारंवार त्याच त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा घडत आहेत, असं वाटत राहतं. 'पंचायत ४'चा शेवट अत्यंत भावनिक असूनही तो भिडत नाही, हे सर्वस्वी लिखाणाचं अपयश आहे.

अभिनय:

सर्वच कलाकारांनी चांगलं काम केलंय. पण यावेळी खरी बाजी मारलीय ती 'बनराकस गँग'ने. सुनिता राजवर (क्रांती देवी), दुर्गेश कुमार (बनराकस भूषण), अशोक पाठक (बिनोद), बुल्लु कुमार (माधव) या चौघांनीही अफलातून काम केलंय. 'पंचायत ४'मधला एक एपिसोड फक्त बिनोदवर आधारीत आहे. त्यावेळी अशोकने केलेलं काम विशेष लक्षात राहतं. विशिष्ट टोन काढून संवाद कमी असूनही केवळ हावभावांनी अशोक पाठक 'बिनोद'च्या भूमिकेत मन जिंकतो. शेवटच्या प्रसंगातही अशोकने डोळ्यांद्वारे केलेला अभिनय लक्षात राहतो. हे चारही जण यावेळी 'पंचायत ४'चे हिरो आहेत, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. दुसरीकडे जितेंद्र कुमार (सचिवजी), नीना गुप्ता (मंजु देवी), रघुबीर यादव (प्रधानजी), सान्विका (रिंकी), फैसल मलिक (प्रल्हाद), चंदन रॉय (विकास) या कलाकारांनीही पुन्हा एकदा आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. पण लिखाणाची साथ नसल्याने त्यांच्या व्यक्तिरेखा या सीझनमध्ये खुलत नाहीत.

एखादं फळ जेव्हा छोटंसं, नाजूक असतं तेव्हा ते खऱ्या अर्थाने रसाळ आणि चविष्ट असतं. कधीकधी आकाराने मोठी असलेली फळं बेचव असतात. कारण त्यांना रासायनिक प्रक्रियेने वाढवलं असतं. त्यांच्यातला नैसर्गिकपणा निघून जातो. 'पंचायत ४'चंही असंच झालंय. मागणी तसा पुरवठा, असा विचार करुन हा सीझन बनवण्यात आला आहे. त्यामुळेच त्यातली अस्सलता हरवली आहे. 'पंचायत'चा पुढील सीझन आलाच तर तो जास्त न ताणता, त्याचा सुखद शेवट होईल, हीच आशा. एखादी चांगली कलाकृती पाहून संपते तेव्हा, 'अजून एखादा भाग असायला हवा होता', अशी चुटपुट मनाला लागते. 'पंचायत'च्या आधीच्या तीनही सीझन्सने हे खरंही केलंय. पण हा सीझन पाहिल्यावर ती 'चुटपुट' लागत नाही, इतकंच!

Web Title: Panchayat 4 Review starring neena gupta jitendra kumar raghubir yadav faisal malik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.