'वीण दोघातली ही तुटेना'च्या विवाहसोहळ्याच्या शूटिंगचा तेजश्री प्रधानने सांगितला अनुभव, म्हणाली-"इतक्या उष्ण वातावरणात.."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 18:44 IST2025-11-06T18:40:13+5:302025-11-06T18:44:05+5:30
Veen Doghatali Hi Tutena Serial : 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर दोन जोडप्यांच्या भव्य डेस्टिनेशन बीच वेडिंगचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. या मालिकेतील 'स्वानंदी' म्हणजेच तेजश्री प्रधान हिने तिचा अनुभव सांगितला.

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'वीण दोघातली ही तुटेना' या मालिकेत गोव्यातील समुद्रकिनाऱ्यावर दोन जोडप्यांच्या भव्य डेस्टिनेशन बीच वेडिंगचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिलाच प्रयत्न असून, या नव्या उपक्रमाने मालिकेला एक वेगळं स्थान दिलं आहे.

या मालिकेतील 'स्वानंदी' म्हणजेच तेजश्री प्रधान हिने तिचा अनुभव सांगितला. तेजश्री म्हणाली, "'वीण दोघातली ही तुटेना' महाविवाह सोहळा गोव्यात झालेल्या डेस्टिनेशन बीच वेडिंगचं शूटिंग करताना मी सगळ्यात जास्त एन्जॉय केले ते म्हणजे तिथले मासे खाऊन!"

ती पुढे म्हणाली की, ''तिथल्या शूटिंगची सगळ्यात आव्हानात्मक गोष्ट सांगायची झाली तर ४० - ४४ डिग्री तापमानात समुद्रकिनारी शूट करणं. इतक्या उष्ण वातावरणात वेडिंग लूक सांभाळणं, कपडे, दागिने, मेकअप यांची काळजी घेणं आणि त्या सगळ्यात भावनांवर नियंत्रण ठेवणं हे खरंच कठीण होतं. पण तरीही आम्ही सगळ्यांनी हा अनुभव मनापासून एन्जॉय केला.''

''लोकेशन इतकं सुंदर होतं की सूर्य मावळताना हवामान थंड, वाऱ्याचं आल्हाददायक झुळूक देणारं आणि आकाशात दिसणारा सुंदर तांबडा रंग पाहताना आमचा सगळा थकवा गायब व्हायचा. मग आम्ही सगळे सूर्यास्ताचा मस्त आनंद घ्यायचो'.', असे तेजश्रीने सांगितले.

तेजश्री पुढे म्हणाली, ''आमच्या लूकबद्दल बोलायचे झालेतर हळदी आणि वेडिंग लूक दोन्ही खूप खास होते. दोन्ही तयार करण्यासाठी खूप मेहनत घेतली गेली. राजवाडे कुटुंब हे समाजातील एक प्रतिष्ठित घराणं म्हणून दाखवलं जातंय, त्यामुळे त्यांच्या स्टेटसला साजेसं सगळं बारकाईनं डिझाईन केलं गेलं.''

''स्पेशल ब्लाउज डिझाईन करणं, सुंदर साड्या तयार करणं. प्रत्येक गोष्टीकडे काळजीपूर्वक लक्ष दिलं गेलं. फक्त वधू नव्हे, तर वराचाही लूक तितकाच शाही ठेवण्यात आला. ‘आधिरा’ आणि ‘स्वानंदी’ या दोघींचा वेगळा स्वभाव लक्षात घेऊन त्यांचे लूक डिझाईन करण्यात आले.'', असेही तिने सांगितलं.

मराठी टेलिव्हिजनवरील हा पहिलाच डेस्टिनेशन वेडिंग आहे असे म्हटलं जात आहे. याबद्दल तेजश्री म्हणाली की,''पहिल्यांदा असलेली गोष्ट नेहमी खास असते. या सर्वाचं श्रेय निर्मात्याला जातं. आम्ही कलाकार म्हणून फक्त ठरवलेला मार्ग अनुसरतो, पण आमचं सर्वकाही व्यवस्थित पार पडावं म्हणून प्रोड्युसरनी प्रत्येक गोष्टीची उत्तम काळजी घेतली.''

फ्लाइट, लोकेशन, राहण्याची सोय, हॉटेलच आतिथ्य सगळं काही अप्रतिम होतं. टीव्ही सीरियल असल्यामुळे कुठेही तडजोड झाली नाही, हे कौतुकास्पद आहे. निर्माते कधीही लाईमलाईटमध्ये नसतात, पण त्यांच्या परिश्रमामुळेच हा टप्पा गाठता आल्याचे तिने सांगितले.

''आम्हा सर्वांना अभिमान आहे की ‘वीण दोघातली ही तुटेना’चा हा डेस्टिनेशन बीच महाविवाह एक माईलस्टोन ठरला. आम्ही पहिले आहोत, हे सांगणं हीच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. असेच सुवर्णक्षणं मराठी टेलिव्हिजनवर पुन्हा पुन्हा यावे हीच इच्छा'', असेही तिने यावेळी म्हटले.

















