"मला रक्ताची उलटी झाली अन्...", आदेश भाऊजींनी सांगितला थरारक प्रसंग, म्हणाले, "उद्धव साहेबांच्या फोनमुळे..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 04:47 PM2023-10-03T16:47:12+5:302023-10-03T18:05:06+5:30

दुधीचा रस पिणं बेतलेलं आदेश बांदेकरांच्या जीवावर, सांगितला थरारक प्रसंग, म्हणाले...

महाराष्ट्राचे लाडके भाऊजी आणि मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे आदेश बांदेकर. मध्यम वर्गीय कुटुंबातून आलेल्या आदेश बांदेकरांनी कठीण परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात स्वत:चं नाव कमावलं. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाने त्यांना खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली.

नुकतंच 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमाला १९ वर्ष पूर्ण झाली. टेलिव्हिजनवर इतकी वर्ष अविरतपणे सुरू असलेला हा एकमेव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने आदेश बांदेकरांनी नुकतीच मुंबई तकला मुलाखत दिली.

या मुलाखतीत आदेश बांदेकरांनी सिनेसृष्टीतील प्रवास, वैयक्तिक आयुष्य, लग्न यांसारख्या अनेक गोष्टींचा खुलासा केला. आदेश बांदेकरांनी या मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील थरारक प्रसंगही सांगितला.

दुधीचा रस पिणं आदेश बांदेकरांच्या जीवावर बेतलं होतं. यामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. या प्रसंगाबाबत ते म्हणाले, "आजी आजोबांकडून आपण बऱ्याचशा गोष्टी शिकल्या पाहिजेत. आजकाल इतर जबाबदाऱ्या असल्यामुळे आपण पटकन सगळं उरकतो. पूर्वीची माणसं भाजी किंवा फळं कापली की ती त्याचा तुकडा चावून बघायची. या प्रसंगामुळे मला आजीचं आजीपण आठवलं."

"सकाळी मी उठलो. मला अजूनही आठवतं तेव्हा उद्धव साहेबांचा फोन आला होता. त्यामुळे मी वाचलो. मला रोज व्हेजिटेबल ज्यूस पिण्याची सवय होती. त्यामुळे सवयीप्रमाणे मी त्यादिवशीही दुधीचा रस प्यायलो."

पुढे त्यांनी सांगितलं, "जर दुधी कडू असेल तर त्यात दहा नागांचे विष आहे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. कोणत्या प्राण्याने चावलं म्हणून दुधी कडू होतो, असं नाही. त्यावर अॅन्टिंडोटही नाही."

"मी असाच त्यादिवशी दुधीचा ज्यूस प्यायलो. सुचित्राची मीटिंग असल्यामुळे तीदेखील घरी नव्हती. फोनवर बोलता बोलता मी तो ज्यूस प्यायलो. त्यानंतर काही कामानिमित्त साहेबांचा फोन आला. त्यांच्याशी मी १०-१५ मिनिटं बोललो."

"त्यांचा फोन आला म्हणून मी घरातच थांबलो. नाहीतर मी शूटिंगसाठी कर्जतला निघालो होतो. त्यानंतर २०-२५ मिनिटांत मला उलट्या आणि जुलाब होऊ लागले. त्यानंतर मला ३-३.५० लिटरची रक्ताची उलटी झाली,"असंही ते म्हणाले.

"त्यानंतर माझ्याबरोबर असलेल्या दोघांनी मला हिरानंदानी हॉस्पिटलला नेलं. माझं ब्लड प्रेशर लो झालं होतं. हार्ट रेट कमी होत होता. त्यांनी सुचित्राला फोन करुन लगेच बोलवून घेतलं. आमच्या हातात काही नाही असं डॉक्टर म्हणाले होते."

"माझे डोळे बंद झाले. त्यानंतर काय जादू झाली, मला माहीत नाही. पण, जेव्हा मी डोळे उघडले. तेव्हा माझ्यासमोर सुचित्रा, सोहम आणि उद्धवसाहेब असे तिघे उभे होते. मी हे कधीही विसरणार नाही," असं म्हणत बांदेकरांनी थरारक प्रसंग सांगितला.