त्या रात्री नेमकं काय घडलं? श्रीदेवीच्या मृत्यूबाबत बोनी कपूर यांचा खुलासा; म्हणाले- "लग्नानंतर अनेकदा..."

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 08:58 PM2023-10-02T20:58:34+5:302023-10-02T21:07:27+5:30

"आमचं जेव्हा लग्न झालं त्यानंतर अनेकदा हा प्रकार घडला होता, तेच तिच्या जीवावर बेतलं"

बॉलिवूडची 'रूप की रानी' श्रीदेवीच्या मृत्यूला 5 वर्षे झाली आहेत. ही ५ वर्षे कपूर कुटुंबासाठी किती कठीण होती हे बोनी कपूर आणि त्यांच्या दोन मुली जान्हवी कपूर आणि खुशी कपूर यांच्यापेक्षा चांगले कोण सांगू शकेल.

एका कौटुंबिक कार्यक्रमात श्रीदेवी आणि बोनी कपूर हजर असताना, बाथटबमध्ये श्रीदेवीचा मृतदेह आढळला होता. त्यामुळे या मृत्यू प्रकरणावर बरीच चर्चा रंगली होती.

नुकतेच बोनी कपूर यांनी त्या रात्री घडलेल्या प्रकाराबाबत मौन सोडले आहे. बोनी कपूर यांचे हे वक्तव्य मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

बोनी कपूर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले, "श्रीदेवीचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. याप्रकरणी माझी तासन् तास चौकशी करण्यात आली."

पुढे ते म्हणाले, "या प्रकरणाचा तपास सुरू असताना पोलीस अधिकाऱ्याने मला सांगितले होते की, भारतीय मीडियाचा खूप दबाव आहे त्यामुळे आम्हाला हे सर्व करावे लागत आहे."

"माझी चौकशी केल्यावर त्यांना असे आढळून आले की यात कोणताही गैरप्रकार झालेला नव्हता. मी लाय डिटेक्टर चाचण्या आणि इतर चाचण्यांनाही सामोरा गेलो," असं बोनी कपूर यांनी स्पष्ट केलं. तसेच बोनी कपूर यांनी श्रीदेवीच्या मृत्यूचे कारणही सांगितले.

"ती अनेकदा डाएट फॉलो करण्यासाठी उपाशी राहायची. तिला कायम फिट दिसणं आवडायचं. त्या नादात अनेक तिचं ब्लड प्रेशर कमी व्हायचं आणि डॉक्टरने तिला स्वत:ची काळजी घ्यायचा अनेकदा सल्ला दिला होता," असे बोनी कपूर म्हणाले.

यालाच जोड देताना बोनी कपूर म्हणाले, "तिचं अनेकदा क्रॅश डाएट होत असायचं. त्यामुळे आमचं लग्न झालं त्यानंतर अनेक वेळा अशी परिस्थिती आली आहे की ती अचानक बेशुद्ध पडली होती."

"इतकं सारं होऊनही ती कोणत्याच गोष्टी गांभीर्याने घेत नव्हती. अशा प्रकारे तिची वागणून असल्याने हेच तिच्या जीवावर बेतलं", असं बोनी कपूर यांनी स्पष्ट केले.