"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
By कोमल खांबे | Updated: June 26, 2025 11:02 IST2025-06-26T11:02:37+5:302025-06-26T11:02:59+5:30
अभिनेता मकरंद अनासपुरे यांनीदेखील पहिलीपासून हिंदी नको, अशी भूमिका मांडली आहे.

"इतक्या लहान वयात काय गरज आहे?", हिंदी भाषा सक्तीवरुन मकरंद अनासपुरे थेटच बोलले
राज्यात सरकारने त्रिभाषा धोरण स्वीकारत पहिलीपासून मराठी आणि इंग्रजी भाषेसोबत हिंदी भाषा अनिवार्य केली आहे. हिंदी भाषेला पर्याय म्हणून मुलांना इतर २० भाषेंचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र यासाठी किमान २० मुलांचा गट असणं आवश्यक आहे. सरकारच्या या निर्णयावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. तसंच या निर्णयाला कडाडून विरोधही होत आहे. अभिनेता मकरंद अनासपुरे यांनीदेखील पहिलीपासून हिंदी नको, अशी भूमिका मांडली आहे.
मकरंद अनासपुरेंनी न्यूज १८ लोकमत या वृत्तवाहिनीशी बोलताना सरकारच्या या निर्णयावर त्यांचं मत मांडलं. ते म्हणाले, "पहिली इयत्तेपासून हिंदी भाषेची सक्ती अजिबात असू नये. कारण, आपापल्या गरजेनुसार माणूस त्या त्या भाषांमध्ये संवाद साधतो. मी 'पिंजरेवाली मुनिया' नावाचा भोजपुरी सिनेमा केला आहे. मला भोजपुरी येत नाही. पण, मी त्या सिनेमापुरतं बोललेलो आहे. त्यामुळे गरजेपुरतं आपल्याला ते करता येतं. दुसरं म्हणजे इतक्या लहान वयात मातृभाषा मुलगा शिकत असताना त्याला हिंदीची सक्ती कशासाठी? मराठी आणि हिंदी या दोन्ही देवनागरी असल्या तरी व्याकरण वेगळं आहे. मराठीतील ऱ्हस्व हे हिंदीत दीर्घ आहे. शब्दांमध्येही घोळ होण्याची शक्यता आहे. म्हणजे मराठीत चेष्टा म्हणजे टवाळी होते. तर हिंदीत चेष्टा म्हणजे प्रयत्न करणं होतं. त्यामुळे अशा पद्धतीचा घोळ होऊ शकतो".
"शिवाय इतक्या लहान वयात काय गरज आहे? असा मला पडलेला प्रश्न आहे. त्यामुळे पहिल्या इयत्तेपासून हिंदी सक्तीची नको, हे माझं स्पष्ट मत आहे. आम्ही पण पाचवीपासून हिंदी शिकलो. आणि त्यामुळे फारसा फरक पडलेला नाही. मी परदेशात गेलो तरी भाषेमुळे काही भानगड आली अशातला भाग नाही. आपण तेवढ्यापुरतं जुजबी मोडकं तोडकं बोलतं. पण, आपली भाषा ही आपल्याला स्वच्छपणे येणं. आपल्याला ती माहीत असणं. आपल्या भाषेवर आपलं प्रेम असणं ही मला महत्त्वाची गोष्ट वाटते. मी ग्रामीण भाषांमधल्या सिनेमांमध्ये काम केलेलं असलं तरी त्यामध्ये बऱ्याच म्हणींचाही वापर केलेला आहे. वेगवेगळे शब्दही मी त्यामध्ये वापरलेले आहेत. भाषिक सौंदर्यासाठी प्रत्येक जण आपल्या पद्धतीने प्रयत्न करत असतो", असं मत मकरंद अनासपुरेंनी मांडलं.
पुढे ते म्हणाले, "मी कॉस्मोपॉलिटियन सोसायटीमध्ये राहतो. जेव्हा माझा मुलगा म्हणाला की मी कोशिश केली पण मला जमलं नाही. तेव्हा मी बायकोला सांगितलं. त्यामुळे घरात स्पष्ट मराठी बोललं गेलं पाहिजे. आपल्या भाषेचा अभिमान आपण बाळगलाच पाहिजे. मी सातत्याने मराठीच बोलतो. मी कोणतीही वेगळी भाषा बोलत नाही. जिथे गरजेचं असतं तिथे आपल्याला तोडकं मोडकं संवाद साधता येतो. आपण भाषेला मोठं करत नसतो. तर भाषेमुळे आपण मोठे होतो".