Exclusive: चित्रपटानंतर वेब सीरिजकडे! 'अमर विश्वास'मधून 'OTT'वर पदार्पण करण्याऱ्या सौरभ गोखलेने व्यक्त केल्या भावना
By सुजित शिर्के | Updated: February 16, 2026 17:24 IST2026-02-16T17:20:22+5:302026-02-16T17:24:47+5:30
Exclusive: मालिका, चित्रपटानंतर वेब सीरिजकडे; 'अमर विश्वास' मधून ओटीटीवर पदार्पण करण्याऱ्या सौरभ गोखलने शेअर केला अनुभव

Exclusive: चित्रपटानंतर वेब सीरिजकडे! 'अमर विश्वास'मधून 'OTT'वर पदार्पण करण्याऱ्या सौरभ गोखलेने व्यक्त केल्या भावना
गेल्या काही वर्षांत प्रेक्षकांमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे चित्रपट आणि वेब सीरिज पाहण्याची क्रेझ प्रचंड वाढली आहे. अनेक नव्या आणि प्रभावी संकल्पना एखाद्या कलाकृतीत उतरवण्याची संधी या प्लॅटफॉर्मवर मिळते. या माध्यमामुळे प्रेक्षकांसाठी मनोरंजनाचं नवं माध्यम खुलं झालंय.दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ओटीटी विश्वात ‘अमर विश्वास’(Amar Vishwas) या सीरिजची मोठी चर्चा आहे. ‘अमर विश्वास’ ही वेबसिरीज लेखक सुहास शिरवळकर यांच्या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये मराठी अभिनेतासौरभ गोखलेचीही (Saurabh Gokhale) मुख्य भूमिका आहे. यानिमित्ताने सौरभ गोखलेने लोकमत फिल्मीसोबत संवाद साधला....
>>> सुजित शिर्के
'अमर विश्वास' या सीरीजच्या निमित्तानं हिंदी ओटीटी विश्वात पाऊल ठेवतोयस. त्याबद्दल आणि सीरीजविषयी काय सांगशील?
"मला एक चांगली गोष्ट वाटली की,ओटीटीवर हल्ली कंन्टेट बराच येत आहे. ओटीटीवरील त्या ८-१० एपिसोडमुळे बऱ्याच वेळेला तो कंन्टेन्ट ताणल्यासारखाही वाटण्याची शक्यता असते. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी एक अशी सीरिज माझ्याकडे आली जी एका उत्तम पुस्तकावर आधारित आहे. जेव्हा पुस्तकाचा कंन्टेट स्ट्रॉंग असतो आणि कथानक जर सुंदर पद्धतीने मांडलं असेल तर तेव्हा ते तितक्याच उत्तम पद्धतीने पडद्यावर येतं. मराठीतील सिद्धहस्त लेखक सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर ही सीरिज आहे. शशांत शहा यांनी ही दिग्दर्शित केलीय आणि प्रसाद भेंडे हे याचे DOP आहेत, ही माझ्यासाठी एक सुवर्णसंधी होती. मी स्वत: ला भाग्यवान समजतो की समांतरसारख्या मालिका ज्यांनी आपल्याला दिल्या आहेत त्या कार्तिक निशाणदार आणि अर्जुनसिंग बारन यांच्याकडून ही सीरिज ऑफर झाल्यानंतर काम करायला मजा आली."
सीरिजमध्ये तू खांडेकर नावाच्या पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहेस.ही भूमिका तु्झ्याकडे आल्यानंतर काय भावना होत्या? त्यासाठी विशेष मेहनत करावी लागली?
"मला ही भूमिका खूप आवडली कारण सीरिजमध्ये या पोलिसाच्या पात्राला नेहमीप्रमाणे फक्त कणखर न दाखवता त्याच्या आयुष्याचे वेगळे कंगोरेही दाखवले आहेत. लग्नासाठी मुली पाहण्याचे प्रसंग आणि त्याची वैयक्तिक बाजू, यामुळे तो सर्वसामान्य माणूस वाटतो. अविनाश खांडेकरची ही भूमिका त्यामुळे अधिक प्रभावी झाली आहे. खांडेकर हा या केस मध्ये सरकार कडून इन्व्हेस्टीगेटिंग ऑफिसर आहे पण अमर विश्वास याचा मित्रही आहे. पण हा एक सरकारी अधिकारी असल्यामुळे त्याला सरळ-सरळ त्याला मदतही करता येऊ शकत नाही. त्यामुळे आपल्या प्रोफेशनसोबत प्रामाणिक राहून केस सोडवण्यात जितकी मदत होईल तितकी मदत दोन्हीही बाजूंना देण्याचा तो प्रयत्न करतो. शिवाय त्याला त्याचं एक वेगळं आयुष्य आहे."
राजीव खंडेलवाल, रवी बहल असे कलाकार तुला या प्रवासात लाभले. कसा होता काम करण्याचा अनुभव?
"राजीव खंडेलवाल आणि मी एकाच जिममध्ये असल्याने आमची आधीपासून ओळख होती. त्यानंतर अचानक मला प्रोजेक्ट ठरल्यानंतर कळालं की मी राजीव खंडेलवाल यांच्यासोबत काम करतोय. अनिल चरणजीतसोबत मी रोहित शेट्टीच्या सर्कस चित्रपटात काम केलं आहे. तसेच माझ्याबरोबर अभिजीत गुरु देखील आहे, तो सुद्धा माझा चांगला मित्र आहे. मात्र, यानिमित्ताने रवी बहल सरांसोबत माझी पहिल्यांदा ओळख झाली. तो माणूस उत्तम आहे. बऱ्याचदा आपल्याला माहीत नसतं ही माणसं कशी आहेत. पण, काम करताना ही सर्व कलाकार खूप सहकार्य करतात. मी असो किंवा अभिजीत असो आमच्यासारख्या थिएटर ट्रेंड अभिनेत्यांच त्यांना वेगळं कौतुक आहे. एखादा सीन कसा चांगला करतोय,यासाठी ते मदतीसाठी कायम तत्पर असतात. शिवाय प्रत्येकजण आपल्या कामाशी आणि भूमिकेशी प्रामाणिक असल्यामुळे हे छान जुळून आलं."
मराठी मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवरही तू काम केलंस याचा प्रेक्षकवर्ग आणि ओटीटीचा प्रेक्षकपूर्णपणे वेगळा आहे, या माध्यमात काम करताना काय वेगळेपण जाणवलं?
"ओटीटी माध्यम हे मला खूप चांगलं वाटतं. आधी टीव्ही मालिका असतील तर त्या पाहण्यासाठी तुम्ही टीव्हीसमोर असणं गरजेचं आहे. पण, आता ओटीटीमुळे तुम्ही प्रत्येक माणसापर्यंत पोहोचला आहात. माणूस जरी प्रवासात असेल तरी त्या वेळेतही तो तुमचा कंन्टेट पाहू शकतो. तुमचं काम बघू शकतो. त्यामुळे हे माध्यम मला अतिशय महत्वाचं वाटतं. जे कलाकार प्रचंड हुशार आहेत, ज्यांना कदाचित सिनेमा, थिएटरमध्ये
काम करण्याची संधी मिळत नाही. ते लोक त्यांचं कौशल्य ओटीटीद्वारे तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतात.याच्यासाठी तुम्हाला कोणता मोठा प्लॅटफॉर्मच पाहिजे असं नाही. अनेक लोकं आहेत जे छोट्या प्लॅटफॉर्मवरचा कंन्टेट देखील पाहतात. त्यामुळे हे माध्यम संपूर्ण कलाविश्वासाठी महत्त्वाचं आहे, असं मला वाटतं.ही या माध्यमाची चांगली गोष्ट आहे. "