हिंदी चित्रपट - रॉक द वॉक
By Admin | Updated: November 12, 2016 05:24 IST2016-11-12T05:24:40+5:302016-11-12T05:24:40+5:30
सन २००८ मध्ये फरहान अख्तरने त्याच्या प्रॉडक्शन बॅनरखाली रॉक आॅन हा म्युझिकल ड्रामा साकारला होता. अभिषेक कपूर दिग्दर्शित रॉक आॅनला समीक्षकांनी चांगली दाद दिली होती

हिंदी चित्रपट - रॉक द वॉक
- जान्हवी सामंत
सन २००८ मध्ये फरहान अख्तरने त्याच्या प्रॉडक्शन बॅनरखाली रॉक आॅन हा म्युझिकल ड्रामा साकारला होता. अभिषेक कपूर दिग्दर्शित रॉक आॅनला समीक्षकांनी चांगली दाद दिली होती. प्रेक्षकांनाही हा चित्रपट भावला होता. हा चित्रपट त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. एक फ्रेश म्युझिक कन्सेप्ट, एक आगळावेगळा म्युझिकल ड्रामा या चित्रपटाच्या निमित्ताने प्रेक्षकांना बघायला मिळाला होता. तब्बल आठ वर्षांच्या अंतराने याच चित्रपटाचा सीक्वल ‘रॉक आॅन 2’ आज चित्रपटगृहांमध्ये झळकला. त्याच म्युझिक बँडमधील सदस्यांसह काही नव्या पात्रांची एन्ट्री हे शुजात सौदागर दिग्दर्शित ‘रॉक आॅन २’चे वैशिष्ट्य आहे.
तसे पाहता, ‘रॉक आॅन’ संपतो तिथूनच ‘रॉक आॅन 2’ची कथा सुरू होते. आदित्य, जो आणि केडी हे तिघे आजही मित्र आहेत. जो (अर्जुन रामपाल) एका मोठ्या लोकप्रिय क्लबचा मालक आणि तितक्याच लोकप्रिय रिअॅलिटी शोचा जज आहे. केडी (पुरब कोहली) हा यशस्वी अॅड जिंगल्स कम्पोझर असतो. आदित्य उर्फ आदी (फरहान अख्तर) मात्र रॉब (ल्यूक केनी)च्या मृत्यूनंतर म्युझिक बँडशिवाय पत्नी व मुलाला सोडून दूर मेघालयातील शेतकऱ्यांसोबत आयुष्य जगतो आहे. आदीची पत्नी व मुलगा मुंबईत राहत असतात आणि त्याला अधूनमधून भेटत असतात. आदी, जो आणि केडी अद्यापही एकमेकांचे मित्र आहेत. त्यांच्याही भेटीगाठी होत राहतात. पण या सर्वांना एकत्र बांधून ठेवणारा संगीताचा एक धागा मात्र तुटलेला आहे. याच वळणावर जिया (श्रद्धा कपूर) ही एका बड्या शास्त्रीय गायकाची मुलगी, हिची चित्रपटात एन्ट्री होते. तिच्या वडिलांना तिने शास्त्रीय संगीतात करिअर बनवावे असे वाटते तर जियाला रॉक म्युझिकमध्ये रस असतो. वडिलांच्या दहशतीत वावरणाऱ्या जियाची भेट एकेदिवशी उदय (शशांक अरोरा) या सरोदवादकाशी होते. या दोघांना जोच्या क्लबमध्ये परफॉर्मन्स करण्याची संधी मिळते. पण संधी मिळूनही जिया स्टेज परफॉर्मन्स करू शकत नाही. जियाच्या आयुष्याचा एक धागा आदित्यच्या भूतकाळाशी जुळलेला असतो. येथून ‘रॉक आॅन 2’ची कथा खऱ्या वळणावर येते.
चित्रपटाची सुरुवात संथ आहे. चित्रपटातील प्रत्येक पात्र आपआपल्या प्रपंचात गुंतलेले आहे. त्यांना एकत्र आणून कथा जुन्या प्लॉटवर आणली जाते. चित्रपटाचा पहिला भाग हा प्लॉट तयार करण्यातच जातो. यामुळे चित्रपट हळूहळू पुढे सरकतो. दुसऱ्या भागात चित्रपटाची कथा खऱ्या अर्थाने आकार घेते. अर्थात तोपर्यंत यातील अनेक दृश्ये भावनिक व संवेदनशील असूनही काहीशी विसंगत वाटतात. चित्रपटातील पात्रेही अनेक ठिकाणी विसंगत जाणवतात.
अनेक पात्रांना एका साखळीत आणण्याच्या प्रयत्नांत कथा काहीशी भरकटत जाते. कथेत काहीही नावीन्य जाणवत नाही. सतत अपयश आल्याने निराश झालेला संगीतवेडा, शास्त्रीय विरुद्ध पाश्चात्त्य संगीतावरची चर्चा, पैसा विरुद्ध कला असे अनेक पारंपरिक विषय यात चर्चेत येतात. केवळ आदित्यचे पात्र कथेशी सुसंगत वाटते, पण तेही काही दृश्यांपुरतेच. त्याचे वैवाहिक आयुष्यही कथेशी सुसंगत वाटत नाही. खरे तर त्याच्या वैवाहिक आयुष्यात मोठे वादळ येते. पण त्याचाही त्याच्यावर काहीच फरक पडताना दिसत नाही. चित्रपटात फरहान, श्रद्धा, अर्जुन व पुरब यांनी आपआपली भूमिका बऱ्यापैकी वठवलीय. श्रद्धा यात कधी नव्हे इतकी फ्रेश वाटते. पण गाणी सोडली तर पडद्यावर या सर्वांची परस्परांसोबतची केमिस्ट्री मात्र कुठेच दिसत नाही. शंकर एहसान लॉयचे संगीत ताजे आहे. काहीशी जुन्या ‘रॉक आॅन’च्या धर्तीची तर काहीशी नव्या चवीची. पण रॉक आॅनसोबत तुलना केली तर चित्रपट कुठेही छाप सोडत नाही. दिग्दर्शकाला रॉक आॅनइतका चांगला चित्रपट बनवता आला नाही, हेच चित्रपट पाहताना जाणवते. पण तरीही तो एकदा पाहण्यास काहीच हरकत नाही.