लगान या चित्रपटाच्या नावावर आहे हा विक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 08:00 IST2018-08-25T13:19:36+5:302018-08-27T08:00:00+5:30
लगान या चित्रपटात आमिर खानने भुवन ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्याचसोबत या चित्रपटाने अनेक पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती.

लगान या चित्रपटाच्या नावावर आहे हा विक्रम
बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटात आजवर आपल्याला ब्रिटीश कलाकार पाहायला मिळाले आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का, सगळ्यात जास्त ब्रिटीश कलाकार कोणत्या चित्रपटात आहेत. या चित्रपटाचे नाव आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत...
लगान या चित्रपटात आमिर खानने भुवन ही व्यक्तिरेखा साकारली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच गल्ला जमवला होता. त्याचसोबत या चित्रपटाने अनेक पुरस्कार सोहळ्यात बाजी मारली होती. एवढेच नव्हे तर या चित्रपटाने ऑस्करपर्यंत धडक मारली होती. या चित्रपटात आमिरसोबत प्रेक्षकांना ग्रेसी सिंगला पाहायला मिळाले होते. तसेच या चित्रपटात सुहासिनी मुळ्ये, राजेंद्र गुप्ता, रघुवीर यादव, राज जुत्शी, प्रदीप रावत, अखिलेश मिश्रा, यशपाल शर्मा, ए. के हंगल यांसारख्या अनेक कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.
लगान या चित्रपटाची स्टार कास्टची यादी ही प्रचंड मोठी आहे. या चित्रपटात बॉलिवूड कलाकारांसोबतच बाहेर देशातील कलाकारांनी देखील काम केले आहे. तुम्हाला माहीत आहे का, लगान या चित्रपटाच्या नावावर एक विक्रम आहे. या चित्रपटात अनेक ब्रिटीश कलाकार आहेत. कोणत्याही बॉलिवूड चित्रपटापेक्षा सगळ्यात जास्त ब्रिटीश कलाकार लगान मध्ये असल्याने ब्रिटीश कलाकार सर्वाधिक असल्याचा विक्रम या चित्रपटाच्या नावावर आहे.
लगान या चित्रपटातील कथा, या चित्रपटातील व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या होत्या. तसेच या चित्रपटातील सगळीच गाणी हिट झाली होती. या चित्रपटातील गाणी लता मंगेशकर, आशा भोसले यांसारख्या दिग्गजांनी गायली होती. या गाण्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. लगान या चित्रपटाचे दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केले होते तर या चित्रपटाची निर्मिती स्वतः आमिर खानने केली होती. या चित्रपटाची कथा ही आशुतोष गोवारिकर यांची होती तर या चित्रपटाच्या सूत्रसंचालनाची भूमिका अमिताभ बच्चन यांनी निभावली होती. या चित्रपटातील त्यांच्या दमदार आवाजावर रसिक फिदा झाले होते. हा चित्रपट प्रदर्शित होऊन आज इतकी वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाही.