Friendship DAY Special : बॉलिवूडच्या ‘या’ मैत्रीला लागली कुणाची नजर?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2017 11:13 IST2017-08-06T05:36:16+5:302017-08-06T11:13:12+5:30
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मैत्रीचे किस्से ऐकवले जायचे. जायचे यासाठी की, कधीकाळी एकमेकांचे जिवलग मित्र असलेल्या या जोड्या आता तुटल्या ...
.jpg)
Friendship DAY Special : बॉलिवूडच्या ‘या’ मैत्रीला लागली कुणाची नजर?
करण जोहर -काजोल
करण जोहर आणि काजोल हे दोघे गत २५ वर्षांपासून एकमेकांचे मित्र होते. त्यांची मैत्री अख्ख्या बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध होती. पण गतवर्षी दोघांच्या मैत्रीला ग्रहण लागले. गतवर्षी करण आणि काजोल यांच्यात मतभेद निर्माण झालेत. करणचा ‘ऐ दिल है मुश्किल’ आणि काजोलचा पती अजय देवगण याचा ‘शिवाय’ हे दोन चित्रपट गतवर्षी बॉक्सआॅफिसवर एकाचवेळी धडकले. याच बॉक्सआॅफिस क्लॅशमुळे करण व काजोलमध्ये दुरावा निर्माण झाला. करणने केआरकेला ‘शिवाय’ची नकारात्मक प्रसिद्धी करण्यासाठी पैसे दिलेत, अशी बातमी त्यावेळी पसरली होती. या संपूर्ण पार्श्वभूमीवर करणने आपल्या आत्मचरित्रात काही खुलासे केले होते. काजोलसोबत आता माझे कुठलेही नाते राहिलेले नाही, असे त्याने सांगून टाकले होते. आमच्यात काही मतभेद झालेत. असे काही घडले, ज्यामुळे मी खोलवर दुखावला गेलो. मी याबद्दल काहीही बोलणार नाही. कारण मला जे झाले ते सगळे चव्हाट्यावर आणायचे नाही. दोन दशकांपासून आमची घनिष्ठ मैत्री होती. पण आता आम्ही एकमेकांकडे पाहून केवळ हाय-हॅलो करतो व पुढे निघतो. खरे तर तिच्यात व माझ्यात काहीही बिनसलेले नव्हतेच. जे काही झाले ते माझ्यात व तिच्या पतीदरम्यान झाले होते. जे काही घडले, ते केवळ ती, मी व तिचा पती एवढे तिघेच जाणतो. पण मी ते सगळे मागे सोडू इच्छितो. २५ वर्षांची मैत्री विसरून ती आपल्या पतीची साथ देत असेल तर माझ्यामते, हा सर्वस्वी तिचा निर्णय आहे, असे तो म्हणाला होता.
सलमान खान - संजय दत्त
सलमान खान आणि संजय दत्त या दोघांची मैत्रीची कधी काळी प्रसिद्ध होती. मात्र तूर्तास दोघांमध्ये काहीही आॅल-वेल नाही. संजय दत्त कारागृहातून सुटला त्यावेळी सलमान त्याला भेटायलादेखील गेला नाही. ही गोष्ट संजय दत्तच्या जिव्हारी लागली आणि त्यांच्या मैत्रीत दुरावा निर्माण झाला. ही मैत्री तुटण्यामागे, संजय दत्तने त्याची मॅनेजर रेश्मा शेट्टी हिची केलेली हकालपट्टी हेही एक कारण सांगितले जाते. कारण सलमाननेच संजयकडे रेश्मा शेट्टीची शिफारस केली होती.
कपिल शर्मा - सुनील ग्रोव्हर
कॉमेडी जगतात लोकप्रीय असलेली ही जोडी दीर्घकाळापासून छोट्या पडद्यावर एकत्र दिसली नाही. सिडनीतील कॉमेडी शो आटोपून भारतात परत येत असताना विमानातच कपिल आणि सुनील यांच्यात वाद झाला. दारूच्या नशेत कपिल सुनीलला नको ते बोलला. यामुळे सुनील इतका दुखावला की, त्याने कपिलच्या शोला रामराम ठोकला. या वादासोबतच दोघांची मैत्रीही संपली.
कृष्णा अभिषेक - सुदेश लहरी
कृष्णा व सुदेश या दोघांची जोडीही कॉमेडी जगतात प्रसिद्ध होती. पण ही जोडीही आता तुटली. ‘द ड्रामा कंपनी’ या शोमधून या जोडीने एक नवी सुरुवात केली होती. पण पुढे हेच त्यांच्यातील वादाचे कारण ठरले. कृष्णाने या शोवर जणू कब्जा केलाय, असे सुदेशला वाटते. त्यामुळे तूर्तास दोघांमध्येही मतभेद निर्माण झाले आहेत.
गोविंदा - डेव्हिड धवन
अभिनेता गोविंदा आणि दिग्दर्शक डेव्हिड धवन यांची मैत्रीही प्रसिद्ध होती. या जोडीने अनेक सुपरहिट चित्रपट दिले. पण या मैत्रीलाही दृष्ट लागली. गत फेबु्रवारीत एका मुलाखतीत गोविंदाने डेव्हिडवर गंभीर आरोप केले होते. डेव्हिडचा स्वभाव डॉमिनेटींग राहिला आहे. कुणाचे चित्रपट हिट झालेत की, त्याला आवडत नाही. तो दुस-यांवर जळतो, असे गोविंदाने म्हटले होते. तूर्तास दोघांचीही मैत्री तुटल्यात जमा आहे.
सलीम खान - जावेद अख्तर
७० च्या दशकात या दोन पटलेखकांची जोडी चांगलीच गाजली होती. प्रेक्षकांचे अपार प्रेम मिळालेली ही लेखकांची पहिली अशी जोडी होती. पण कुठल्याशा कारणावरून या दोघांमध्ये मतभेद निर्माण झाले. अर्थात हे कारण काय, हे अद्यापही समोर आलेले नाही. एका कार्यक्रमात सलीम खान यांना जावेद अख्तरसोबतच्या मतभेदांचे कारण विचारले गेले होते. तेव्हा त्यांनी याचे उत्तर देणे टाळले होते. कधी कधी मतभेद निर्माण होतात, केवळ एवढेच ते बोलले होते.