"त्याच त्याच लोकांना घेऊन सिनेमे बनवणं...", मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल स्पष्टच बोलला सौरभ गोखले, सांगितली सत्य परिस्थिती
By सुजित शिर्के | Updated: February 19, 2026 18:23 IST2026-02-19T18:22:16+5:302026-02-19T18:23:31+5:30
"त्यामुळे मी कदाचित चित्रपटांमध्ये कमी दिसतो...", सौरभ गोखलेने सांगितली इंडस्ट्रीची काळी बाजू, म्हणाला...

"त्याच त्याच लोकांना घेऊन सिनेमे बनवणं...", मराठी इंडस्ट्रीतील ग्रुपिझमबद्दल स्पष्टच बोलला सौरभ गोखले, सांगितली सत्य परिस्थिती
Saurabh Gokhale: अभिनयाच्या झगमगत्या दुनियेत अनेक तरुण-तरुणी उराशी स्वप्न घेऊन येत असतात. मात्र, यातील काहींना यश मिळतं तर काहींच्या पदरी अपयश येतं. याला बऱ्याचदा ग्रुपिझम आणि नेपोटिझमही जबाबदार असतं.बॉलिवूड असो किंवा मराठी फिल्म इंडस्ट्री असो, ग्रुपिझम हा कायमच चर्चेत राहिलेला मुद्दा आहे. याबद्दल अनेक कलाकार वारंवार सांगताना दिसतात. बहुतांश कलाकार यामुळे काम मिळत नसल्याची खंतही व्यक्त करतात.अशातच मराठीतील लोकप्रिय अभिनेता सौरभ गोखलेने यावर आपलं मत मांडलं आहे.
नुकताच सौरभ गोखलेने 'लोकमत फिल्मी'सोबत संवाद साधला. यावेळी "तू हल्ली मालिका आणि चित्रपटांमध्ये फार कमी दिसतोस, यामागे काय कारण आहे?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्याबद्दल बोलताना तो म्हणाला," चित्रपटांबाबतीत बोलायचं झालं तर बऱ्याच लोकांचे हे ठरावीक कंपू असतात. ते लोक त्या-त्या लोकांना घेऊन सिनेमे बनवतात. याच्यात काही चूक आहे असंही मला वाटत नाही... कारण ते त्यांच्याबरोबर कम्फर्टेबल असतात. खरंतर, मला त्या ग्रुपिझममध्ये अडकायला आवडत नाही. मी या गोष्टीपासून वेगळा राहतो. मुळात माझा स्वभावच असा नाही की, सरसकट एकाच माणसासोबत काम करत राहू शकेन. त्यामुळे मी कदाचित चित्रपटांमध्ये कमी दिसतो. पण, माझ्याकडे एखादं चांगलं प्रोजेक्ट आलं तर मी नक्कीच करतो."
यापुढे सौरभ म्हणाला," मला सगळी माध्यमे ही खूप आवडतात.जेव्हा माझ्याकडे एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट येतो तेव्हा त्याच्यासाठी निर्मात्यांकडून जरी चार पैसे जरी कमी मिळत असतील तरी मी तो प्रोजेक्ट करतो. कारण,मला वाटतं ही गोष्ट आणि त्यांची मेहनत प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. पण कधी-कधी असंही होऊ शकतं की, मी फारसा स्क्रिनवर दिसत नसेन. बऱ्याचदा हा त्या लोकांचा क्रिएटिव्ह चॉईस असतो. हा माणूस अमुक एक भूमिकेसाठी आम्हाला योग्य वाटत नाही. म्हणून बऱ्याचवेळा त्यांच्या त्या निर्णयांमध्ये आपण फिट बसत नसलो तर, आपल्याकडे काम येत नाही. पण, मी सगळ्या माध्यमात काम करण्याचा प्रयत्न करतोय. कदाचित ते काम लोकांपर्यंत पोहोचत नसावं." असं वक्तव्य अभिनेत्याने या मुलाखतीत केलं.