बापानेच एकुलत्या एक मुलास कुऱ्हाडीने ठार मारले, पोलिसांनी केली अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 23:18 IST2023-06-20T23:15:32+5:302023-06-20T23:18:52+5:30
दारुसाठी पैसे न मिळाल्याने दर्शनसिंहने आपल्याच लहान मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला.

बापानेच एकुलत्या एक मुलास कुऱ्हाडीने ठार मारले, पोलिसांनी केली अटक
उत्तर प्रदेशच्या ईटाव्हा जिल्ह्यातील एका खून प्रकरणाने सर्वत्र खळबळ उडाली आहे. येथे चक्क वडिलांनी एकुलत्या एक मुलावर कुऱ्हाडीने वार करत त्याचा खून केला. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने जिल्हा हादरला आहे.
दारुच्या नशेत मुलगा आपल्या नातवंडांना मारहाण करत असल्याचं पाहून आजोबांना संताप अनावर झाला. त्यामुळे, त्याने कुऱ्हाड हाती घेऊन आपल्या एकुलत्या एक मुलाच्या डोक्यात घातली. त्यामध्ये मुलाचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी फॉरेन्सिक टीमसह घटनास्थळी धाव घेतली. येथील ऊसराहार ठाणे परीक्षेत्रातील ताखा पंचायतीच्या मजरा कटैला गावांत मंगळवार पहाटे साडे तीन वाजता राहुल कुमार उर्फ दर्शन सिंह (३०) दारुच्या नशेत स्वत:च्याच घरी गोंधळ घालत होता.
दारुसाठी पैसे न मिळाल्याने दर्शनसिंहने आपल्याच लहान मुलांवर कुऱ्हाडीने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मुलाचे हे वर्तन पाहून त्याचे वडिल लक्ष्मीनारायण यांना संताप अनावर झाला. त्यावेळी, मुलाच्या हातातील कुऱ्हाड घेऊन त्यांनी मुलाच्या अंगावर उगारली. मुलाच्या मानेवरच कुऱ्हाडीचे घाव झाल्याने मुलगा जागीच मृत्यू पावला. त्यानंतर, भयभीत झालेल्या लक्ष्मीनारायण यांनी घरापासून ५० मिटर दूरवर कुऱ्हाड शेतात लपवून ठेवली. तर, रक्ताने माखलेले कपडे जवळील एका विहिरीत टाकले.
सकाळी या घटनेची माहिती मिळताच ग्रामसेविका राजेश्वरी देवी यांच्या मुलाने पोलिसांनी संपर्क साधला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला असून कुऱ्हाडीसह कपडेही जप्त केले आहेत. याप्रकरणी आरोपी वडिलांना अटक करण्यात आली असून खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.