आयपीएल स्पर्धेत पंजाब किंग्ज संघाला पहिली ट्रॉफी जिंकून देण्यात श्रेयस अय्यर अपयशी ठरला. पण या दरम्यान प्रीती झिंटाच्या सह मालकीच्या संघाचा 'सरपंच' होत त्याने आपल्या नेतृत्वाची खास छाप सोडली आहे. आयपीएलमधील कॅप्टन्सीत एक नवा इतिहास रचल्यावर तो आता थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी करण्याच्या शर्यतीत आघाडीवर असल्याची माहिती समोर येत आहे. एका बाजूला इंग्लंड दौऱ्यावर त्याची निवड न झाल्याने बीसीसीआय निवडकर्त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत असताना श्रेयस अय्यरकडे बीसीसीआय नव्या कॅप्टनच्या रुपातील चेहरा म्हणून पाहत असल्याचे वृत्त चर्चेत आहे. जाणून घेऊयात यासंदर्भातील सविस्तर माहिती
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
आयपीएलनंतर अय्यर थेट टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत
इंडियन एक्स्पप्रेसनं बीसीसीआयच्या अधिकाऱ्याचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यर हा व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमध्येही त्याला लवकरच संधी मिळेल, असा उल्लेखही या वृत्तामध्ये करण्यात आला आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला श्रेयस अय्यर हा फक्त भारतीय एकदिवसीय संघाचा भाग आहे. आयपीएलनंतर त्याला आंतरराष्ट्रीय टी-२० सह अगदी कसोटी पासून दूर ठेवता येणार नाही. आता तो व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये टीम इंडियाच्या कॅप्टन्सीच्या शर्यतीत सहभागी झाला आहे.
जर असं घडलं तर विराट कोहली पुन्हा कसोटी खेळण्यास तयार होईल! या दिग्गजानं केला मोठा दावा
IPL मध्ये फलंदाजीसह कॅप्टन्सीत रचला इतिहास
आयपीएलच्या १८ व्या हंगामात श्रेयस अय्यरनं पंजाब किंग्जच्या संघाला फायनलमध्ये नेत नवा इतिहास रचला. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात संघाला पराभव स्विकारावा लागला. त्यामुळे पंजाब संघाचे पहिल्या जेतेपदाचे स्वप्नही भंगले. पण जगातील सर्वात लोकप्रिय टी-२० लीगमधील दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज हे तीन फ्रँयाचयी संघ त्याच्या नेतृत्वाखाली फायनल खेळताना दिसले आहेत. गत हंगामात त्याने कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाला चॅम्पियनही केले होते. त्यामुळेच तो नेतृत्वाचा नवा चेहरा म्हणून समोर आलाय.
सध्याच्या घडीला तीन प्रकारात तीन कॅप्टन
रोहित शर्मानं कसोटीतून निवृत्ती घेतल्यावर इंग्लंड दौऱ्यावर शुबमन गिलवर नेतृत्वाची जबाबदारी सोपवत भारतीय कसोटी क्रिकेटमध्ये नव्या पर्वाची सुरुवात झालीये. आंतराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये रोहित शर्मानंतर सूर्यकुमार यादव भारतीय संघाचे नेतृत्व करताना दिसतोय. रोहित शर्मा अजूनही वनडे संघाचा कर्णधार आहे. इंग्लंड दौऱ्यातील कसोटी मालिकेनंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये बांगलादेश दौऱ्यावर ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेसह ३ सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात श्रेयस अय्यर निश्चितच टी-२० संघाचा भाग असेल. यादरम्यान वनडेत कॅप्टन्सी बदल पाहायला मिळून अय्यरकडे कॅप्टन्सीची जबाबदारी देण्यात येणार का? ते पाहण्याजोगे असेल.
Web Title: Shreyas Iyer To Be Rewarded With Captaincy After IPL Success Report Makes Gig Claim
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.