IPL 2026 Playoffs Race : आयपीएल २०२६ स्पर्धेतील PBKS विरुद्ध MI यांच्यातील ५८ सामन्यानंतर प्लेऑफ्सची चुरस अधिक रंगतदार झाली आहे. RCB आणि GT च्या संघाने प्लेऑफ्सचं तिकीट जवळपास निश्चित केले असून उर्वरित दोन जागांसाठी ६ संघांमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने पंजाब किंग्सला पराभवाचा धक्का दिला. परिणामी श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली यंदाच्या हंगामात ७ सामन्यानंतर अपराजित राहिलेला पंजाब किंग्सच्या संघावर प्लेऑफ्समधून बाहेर पडण्याची टांगती तलवार लटकत आहे. ही गोष्ट गुणतालिकेत मोठा उलटफेर दाखवणारी आहे. इथं जाणून घेऊयात प्लेऑफ्सच्या शर्यतीती कोणत्या संघासमोर काय आहे समीकरण?
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
RCB आणि GT चं तिकीट कन्फर्म, फक्त शिक्कामोर्तब होणं बाकी
IPL स्पर्धेत १८ गुण मिळवल्यावर प्लेऑफ्सचं तिकीट कन्फर्म होते. पण आतापर्यंतच्या इतिहासात १६ गुण मिळवणारा संघ कधीच प्लेऑफ्सच्या शर्यतीतून बाहेर पडलेला नाही. त्यामुळे हा आकडा प्लेऑफ्सची मॅजिक फिगर मानला जातो. RCB आणि GT नं हा आकडा गाठला असून त्यांनी आघाडीच्या चारमधील आपले स्थान पक्के केले आहे. हे दोन्ही संघ अव्वल दोनमध्ये राहून क्वॉलिफायर १ खेळत थेट फायनल गाठण्यासाठी जोर लावतील.
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
SRH साठी दोन पैकी एक विजय ठरेल पुरेसा
सनरायझर्स हैदराबादच्या संघाने १२ सामन्यातील ७ विजयासह १४ गुण कमावले आहेत. १८ मेला ते चेन्नई सुपर किंग्स तर २२ मेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहेत. या दोन सामन्यापैकी एक सामना जिंकून ते प्लेऑफ्सचं तिकीट मिळवू शकतात.
PBKS टॉप ४ मध्ये असूनही 'जर तर'च्या समीकरणात अडकण्याचा धोका
पंजाब किंग्सचा संघ अजूनही आघाडीच्या चारमध्ये आहे. पण सलग पाच पराभवामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे. रविवारी १७ मे रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि २३ मे रोजी ते लखनौ विरुद्ध साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळणार आहेत. दोन्ही सामने जिंकून त्यांना १७ गुणांपर्यत पोहचता येईल. पण यातील एक सामना जरी गमावला तर ते जर तरच्या समीकरणात अडकतील.
CSK ला एका पराभवाची मुभा
चेन्नई सुपर किंग्सचा संघ ११ सामन्यानंतर ६ विजयासह १२ गुणांची कमाई करत गुणतालिकेत पाचव्या स्थानी आहे. उर्वरित ३ सामने जिंकून ते १८ गुणांपर्यंत पोहचू शकतात. एखादा सामना गमावला तरी त्यांना १६ गुणांपर्यंत मजल मारता येईल. याचा अर्थ प्लेऑफ्समधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांना किमान दोन सामने जिंकायचे आहेत. शुक्रवारी १५ मेला लखनौ विरुद्ध होणाऱ्या सामन्यानंतर १८ मेला त्यांच्यासमोर सनरायझर्स हैदराबाद आणि २१ मेला गुजरात टायटन्सविरुद्धचे आव्हान असेल.
RR साठी पेपर सोपा असला तरी ....
राजस्थान रॉयल्सच्या संघानेही ११ सामन्यातील ६ विजयासह आपल्या खात्यात १२ गुण जमा केले आहेत. उर्वरित तीन सामन्यातील पहिल्या सामन्यात ते १७ मेला दिल्ली कॅपिटल्सला भिडणार आहेत. १९ मे रोजी लखनौ आणि २४ मेला त्यांची लढत मुंबई इंडियन्स विरुद्ध नियोजित आहे. स्पर्धेतून आधीच बाद झालेल्या MI आणि LSG या दोन संघाशिवाय स्पर्धेत टिकून राहण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा असलेला DC च्या संघालाही हलक्यात घेणं त्यांना परवडणारे नसेल. सर्वच्या सर्व सामने जिंकत ते १८ गुणांसह दिमाखात प्लेऑफ्सचं तिकीट मिळवणार की, सोपा पेपर ते अवघड करणार? ते पाहण्याजोगे असेल.
DC आणि KKR तळ्यात मळ्यात
दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने १२ सामन्यानंतर ५ विजयासह १० गुण कमावले आहेत. उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी ते १४ गुणापर्यंतच पोहचू शकतात. यात १७ मेला ते राजस्थान रॉयल्स आणि २४ मेला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध भिडणार आहेत. यातील एक पराभवासह त्यांच्या उरल्या सुरल्या आशा संपुष्टात येतील. एवढेच नाही तर सर्व सामने जिंकले तरी इतर संघाच्या निकालावर त्यांचे भविष्य अवलंबून असेल. दुसरीकडे कोलकाताचा संघ १६ मे रोजी गुजरात टायटन्स, २० मे रोजी मुंबई इंडियन्स आणि २४ मे रोजी दिल्ली कॅपिटल्सला भिडणार आहे. हे सर्व सामने जिंकले तरी ते १५ गुणांपर्यंत पोहचू शकतील. दोन्ही संघाची अवस्था तळ्यात मळ्यात अशीच काहीशी आहे.