भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रीडा संबंधांबाबत भारत सरकारने आज आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार, द्विपक्षीय मालिकांसाठी पाकिस्तानी संघांना भारतात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच भारतीय संघही पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नाहीत. मात्र, केवळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील बहुपक्षीय स्पर्धांसाठी पाकिस्तानी खेळाडूंना भारतात खेळण्याची सवलत देण्यात आली आहे.
भारत सरकारने स्पष्ट केले आहे की, दोन्ही देशांमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या द्विपक्षीय क्रीडा स्पर्धांमध्ये कुणीही सहभागी होणार नाही. भारतीय संघ पाकिस्तानात जाऊन खेळणार नाही आणि पाकिस्तानी संघांनाही भारतात खेळण्याची परवानगी दिली जाणार नाही. सीमापार दहशतवाद आणि दोन्ही देशांमधील तणावपूर्ण संबंधांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे, वर्ल्डकप, चॅम्पियन्स ट्ऱ़ॉफी यांसारख्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटनांतर्गत भारतात आयोजित होणाऱ्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानी खेळाडू सहभागी होऊ शकतील. आंतरराष्ट्रीय क्रीडा संस्थांच्या नियमांचे पालन करणे आणि स्पर्धा सुरळीत पार पाडणे या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.