Join us

तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी

स्मृती मानधनाच्या शतकी खेळीनंतर गोलंदाजीत स्नेह राणा अन् अमनजोतची दिसली जादू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 18:05 IST

Open in App

 Sri Lanka Womens Tri-Nation Series, 2025 : हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाने श्रीलंकेच्या मैदानात रंगलेल्या तिरंगी वनडे मालिकेतील फायनलमध्ये यजमान श्रीलंकेला ९७ धावांनी पराभूत करत ट्रॉफी जिंकली आहे. या दोन संघांशिवाय या स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा सहभाग होता. दक्षिण आफ्रिकेचा संघ या स्पर्धेतील चार पैकी १ सामना जिंकत स्पर्धेतून आउट झाला होता.

  'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

स्मृतीची शतकी खेळी भारतीय महिला संघाने उभारला होता धावांचा डोंगर

भारत-श्रीलंका यांच्यातील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियमवर रंगलेल्या फायनल सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मानधनाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने निर्धारित ५० षटकात  ३४२ धावांचा डोंगर उभारून लंकेसमोर ३४३ धावांचे टार्गेट सेट केले होते. या धावांचा पाठलाग करातना श्रीलंका महिला संघ ४८.३ षटकात २४५ धावांत आटोपला. गोलंदाजीत भारताकडून स्नेह राणा हिने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तिच्याशिवाय अमनजोत कौरनं ३ विकेट्स आणि नल्लापुरेड्डी श्री चरणी हिने एक विकेट आपल्या खात्यात जमा केली. 

भारतीय महिला संघाचा बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास शो!

फायनल लढतीत स्मृती मानधना हिने १०१ चेंडूत ११६ धावांची खेळी करत संघाला दमदार सुरुवात करून दिली. तिच्याशिवाय सलामीची बॅटर प्रतिका रावल ३० (४९), हरलीन देओल ४७ (५६), हरमनप्रीत कौर ४१(३०), जेमिमा रॉड्रिग्ज ४४ (२९) यांनी उपयुक्त खेळी केल्याचे पाहायला मिळाले. तळाच्या फलंदाजीतल अमजोत कौरनं १२ चेंडूत १८ धावांचे योगदान दिले. दीप्तीनं १४ चेंडूत नाबाद २० धावांची खेळी करत संघाची धावसंख्या ७ विकेट्सच्या मोबदल्यात ३४२ धावांपर्यंत पोहचवली.

आधी अमनजोत कौरनं केली हवा, मग पिक्चरमध्ये आली स्नेह राणा

भारतीय महिला संघाने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकन महिला संघाची  सुरुवात खराब झाली. अमनजोत कौर हिने पहिल्याच षटकातील तिसऱ्या चेंडूवर श्रीलंकेची सलामीची बॅटर हसिनी परेरा हिला शून्यावर पॅव्हेलियनचा दाखवला. विश्मी गुणरत्नेच्या रुपात दुसरी विकेटही अमनजोत कौरनेच घेतली. मग स्नेह राणा पिक्चरमध्ये आली. तिने सेट झालेल्या श्रीलंकन कॅप्टन चामरी अट्टापट्टू हिला ५१ धावांवर बाद केले. ४८ धावा करणारी निलक्षीडी सिल्वाही तिच्याच जाळ्यात फसली. अन् श्रीलंकेसाठी सामना अवघड झाला. ठराविक अंतराने भारतीय गोलंदाजांनी यजमानांना धक्क्यावर धक्के देत श्रीलंकेचा डाव २४५ धावांवर आटोपला. फायनल बाजी मारत भारतीय महिला संघाने तिरंगी वनडे मालिकेच्या ट्रॉफीवरआपले नाव कोरले.  

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघहरनमप्रीत कौरस्मृती मानधनाभारतीय क्रिकेट संघ