IND vs WI, T20 World Cup 2026, Suryakumar Yadav On Sanju Samson Brilliant 97 Runs Inning : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत इतिहास रचण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकले आहे. कोलकाताच्या ईडन गार्डन्सच्या मैदानात रंगलेल्या सुपर ८ फेरीतील 'करो वा मरो' लढतीत टीम इंडियाने वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेले १९६ धावांचे आव्हान १९.२ षटकांत ५ विकेट्स राखून यशस्वीरित्या पार केले. भारतीय संघाच्या विजयात संजू सॅमसन याने निर्णायक खेळी साकारली. त्याने नाबाद ९७ धावांची खेळी केली.
संजू सॅमसनच्या खेळीसंदर्भात काय म्हणाला कर्णधार सूर्या?
सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, "संघ उपांत्य फेरीत पोहोचल्याचा खूप आनंद आहे. आम्हाला जसं खेळायचं होतं, तसंच संघाने प्रदर्शन केलं. हा सामना आमच्यासाठी क्वार्टरफायनलसारखाच होता. संजू सॅमसनने अप्रतिम खेळी केली. मी नेहमी म्हणतो, चांगल्या माणसांबरोबर चांगल्या गोष्टी घडतात. तो संयमाने संधीची वाट पाहत होता. तो जेव्हा संघाबाहेर होता, तेव्हाही शांतपणे मेहनत करत होता. आज त्या मेहनतीचं फळ त्याला योग्य वेळी मिळालं."
संजू सॅमसनचं शतक अवघ्या ३ धावांनी हुकलं! पण पठ्ठ्यानं किंग कोहलीचा विक्रम मोडून जगाचं लक्ष वेधलं
संघाबाहेर पडला, पण सराव नाही सोडला
संजू सॅमसन हा वर्ल्ड कप मोहिमेसाठी संघ निवडीपासून टीम इंडियासाठी पहिल्या पसंतीचा सलामीवीर होता. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेआधी घरच्या मैदानातील टी-२० मालिकेत तो सपशेल अपयशी ठरला. परिणामी भारतीय संघाने ईशान किशन आणि अभिषेक शर्मा या डावखुऱ्यांना समावीराच्या रुपात आजमवले. सूर्यानं सांगितल्याप्रमाणे तो संघाबाहेर असला तरी प्रत्येक सामन्याआधी तो कसून सराव करताना दिसला. संधी मिळाल्यावर अखेर त्याने आपल्यातील धमक दाखवून दिली.
दबावाशिवाय मजा नाही
यावेळी सूर्यकुमार यादवनं गोलंदाजीत सर्वांना अगदी ठरल्याप्रमाणे कामगिरी करुन दाखवली, ही गोष्टही अधोरेखित केली. ईडनवर दवाचा परिणाम होतो, त्यामुळे २०० च्या आसपास धावसंख्येचा पाठलाग करता येतो हे माहिती होते. दबावासंदर्भातील प्रश्नावर सूर्या म्हणाला हो, निश्चित दबाव होता. पण त्याशिवाय मजा कशी येणार? घरच्या मैदानात खेळताना दबाव असणारच. ही परिस्थिती तुम्ही कशी हाताळता तेही महत्त्वाचे आहे.