India vs South Africa, 2nd T20I : पहिल्या टी-२० सामन्यातील लाजिरवाण्या पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने टीम इंडियावर पलटवार करत दुसऱ्या टी-२० सामना जिंकला आहे. या सामन्यातील विजयासह पाहुण्या संघाने पाच सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरीत साधली आहे. दुसऱ्या बाजूला भारतीय संघावर आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये धावांच्या दृष्टीने घरच्या मैदानात सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की ओढावली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
तिलक वर्मा एकटा लढला, बाकी सारे शेर स्वस्तात ढेर
दक्षिण आफ्रिकेनं ठेवलेल्या २०० पार धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुभमन गिल आणि अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी फिरला. कर्णधार सूर्या पुन्हा फंदाजीत अपयशी ठरला. तिलक वर्माचे अर्धशतक वगळता एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. परिणामी भारतीय संघ २० व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर १६२ धावांवर ऑलआउट झाला. दक्षिण आफ्रिकेच्या संघाने ५१ धावांनी सामना जिंकत मालिका सहजा सहजी सोडणार नाही, याचे संकेत दिले. भारताकडून तिलक वर्मानं ३४ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकाराच्या मदतीने ६२ धावांची सर्वोच्च खेळी केली.
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
दक्षिण आफ्रिकेनं सेट केले २०० पार धावांचे टार्गेट
पंजाब येथील न्यू चंदीगड येथील मुल्लानपूरच्या महाराजा यादविंद्र सिंह आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर रंगलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या संघाने निर्धारित २० षटकात ४ बाद २१३ धावा करत टीम इंडियासमोर २१४ धावांचे विक्रमी धावांचे टार्गेट सेट केले होते. आतापर्यंत टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाने एवढ्या धावांचा यशस्वी पाठलाग कधीच केलेला नव्हता. यावेळीही ते साध्य झालं नाही. दक्षिण आफ्रिकेकडून क्विंटन डी कॉक याने ४६ चेंडूत ९० धावांची धमाकेदार खेळी केली. याशिवाय कर्णधार मार्करमनं २६ चेंडूत केलेल्या २९ धावा आणि अखेरच्या षटकात फेरेरा ३० (१६) आणि डेविड मिलर २०(१२) यांच्या तुफान फटकेबाजीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २१३ धावांपर्यंत मजल मारली होती. भारताकडून गोलंदाजीत वरुण चक्रवर्तीनं घेतलेल्या २ विकेट्सशिवाय अक्षर पटेलनं एक विकेट घेतली.
दक्षिण आफ्रिकेच्या संघाने फलंदाजीनंतर गोलंदाजीतही केली कमालीची कामगिरी
भारतीय संघासमोर मोठे आव्हान ठेवल्यावर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सर्वोत्तम कामगिरी करून दाखवत टीम इंडियाला ठराविक अंतराने धक्यावर धक्के दिले. ओटनील बार्टमन याने ४ षटकात २४ धावा खर्च करून दक्षिण आफ्रिकेकडून सर्वोत्तम कामगिरी केली. त्याच्याशिवाय लुंगी एनिगडी, मार्को यान्सेन आणि लुथो सिपामला यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.
आंतरारष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाच्या पदरी आलेले मोठे पराभव
- ८० धावा विरुद्ध न्यूझीलंड, वेलिंग्टन (२०१९)
- ५१ धावा विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मुल्लानपूर, (२०२५)
- ४९ धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, ब्रिजटाऊन (२०१०)
- ४९ धावा विरुद्ध इंदूर, (२०२२)
- ४७ धावा विरुद्ध न्यूझीलंड, नागपूर, (२०१६)