Abhishek Sharma on Gautam Gambhir Suryakumar, Ind vs Eng 1st T20 : भारतीय संघाने उल्लेखनीय कामगिरी करत इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात सहज विजय मिळवला. प्रथम नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडला २० षटकात केवळ १३२ धावांवरच बाद केले. नंतर १३३ धावांचा पाठलाग करताना सलामीवीर अभिषेक शर्माने तुफानी फटकेबाजी केली. त्याने ३४ चेंडूत ७९ धावा ठोकत संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने ५ चौकार आणि ८ षटकारांची आतषबाजी केली. या सामन्यानंतर बोलताना त्याने संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव या दोघांबद्दल स्पष्ट शब्दांत मत मांडले.
"भारताच्या विजयासाठी आज मी जी खेळी केली, त्याचा मला अभिमान आहे. मी कुठल्याही विचाराने मैदानात उतरलो नव्हतो. मी केवळ माझा खेळ करत होतो. या दमदार खेळीसाठी मला माझा कॅप्टन आणि कोच यांना धन्यवाद द्यायचे आहेत. ते दोघेजण जेव्हा आमच्याशी बोलायला येतात, तेव्हा ते आम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य देतात. संघातील कोणत्याही युवा खेळाडूशी ते दोघेजण बोलत असतील, तर ती गोष्ट त्या खेळाडूसाठी खूपच प्रेरणादायी ठरते. आजच्या सामन्यात खेळपट्टी खूपच चांगली होती. आम्ही १६० ते १७० धावांचे आव्हानदेखील सहज पार केले असते असे मला वाटते. पण अशा खेळपट्टीवर भारतीय गोलंदाजांनी खूपच चांगली कामगिरी केली. या सर्व गोष्टींचे श्रेय मला आमच्या कर्णधाराला आणि प्रशिक्षकाला द्यायचे आहे. ते दोघे मुक्तपणे संवाद साधत असल्यानेच आमची कामगिरी चांगली होते," असे अभिषेक म्हणाला.
शमीला संघात का घेतलं नाही?
मोहम्मद शमी हा तब्बल १४ महिन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करत होता. बुमराहच्या अनुपस्थितीत त्याला संघात नक्कीच स्थान मिळेल, असे मानले जात होते. परंतु टॉसच्या दरम्यान सूर्यकुमार यादवने शमी खेळत नसल्याचे सांगितले. त्यानंतर शमीच्या फिटनेसवरून अनेक जणांनी प्रश्न उपस्थित केले. या सर्व प्रकारच्या गोष्टींना अभिषेक शर्माने उत्तर दिले. सामना संपल्यानंतर बोलताना अभिषेक म्हणाला, "हा आमच्या संघ व्यवस्थापनाचा निर्णय आहे. कोलकताची खेळपट्टी पाहता कदाचित त्यांना हाच पर्याय योग्य वाटला असेल."
दरम्यान, पहिल्या टी२० सामन्यात इंग्लंडचा डाव केवळ १३२ धावांत आटोपला. कर्णधार जॉस बटलरच्या ४४ चेंडूत ६८ धावांची खेळी वगळता इतर सर्व फलंदाज फेल गेले. १३३ धावांच्या सोप्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने मात्र तुफानी सुरुवात केली. संजू सॅमसन २० चेंडूत २४ धावा काढून बाद झाला. कर्णधार सूर्यकुमारने खातेही उघडले नाही. पण दुसऱ्या बाजूने अभिषेक शर्माने मात्र ३४ चेंडूत ७९ धावा करून भारतीय संघाचा विजयाचा मार्ग सोपा केला. तो बाद झाल्यावर तिलक वर्माच्या नाबाद १९ धावांच्या बळावर भारताने सहज विजय मिळवला आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.