आशिया चषक २०२३ च्या फायनलच्या आदल्या दिवशी म्हणजे आज निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांनी कोलंबोमध्ये कर्णधार रोहित शर्मा, मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि संपूर्ण संघ व्यवस्थापनासोबत अनौपचारिक बैठक घेतली. टीम हॉटेलमध्ये तीन तास मॅरेथॉन बैठक चालली. फलंदाज प्रशिक्षक विक्रम राठोड आणि गोलंदाज प्रशिक्षक पारस म्हाब्रे हे दोघेही उपस्थित होते. या बैठकीत अंतिम सामन्याव्यतिरिक्त आगरकरने ऑस्ट्रेलिया मालिकेसाठी भारतीय संघाबाबतही चर्चा केली.
आशिया कप फायनलनंतर लगेचच भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन डे सामन्यांची मालिका घरच्या मैदानावर खेळणार आहे. वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी भारतासाठी ही अंतिम संधी असेल. श्रेयस अय्यरसाठी INDvs AUS ही मालिकाही महत्त्वाची असेल. आशिया चषक स्पर्धेत अय्यरचा संघात समावेश झाला, परंतु एक सामना खेळून तो बाहेरच आहे. त्याच्या पाठीच्या दुखापतीने डोकं वर काढल्याने तो नंतर खेळलेला नाही. तो पूर्णपणे फिट आहे की, नाही हेही अद्याप समजलेलं नाही. बीसीसीआयच्या सूत्रानुसात तो रिकव्हर होतोय, परंतु १०० टक्के तंदुरुस्त नाही. त्यामुळे आशिया चषकाच्या फायनलमध्येही त्याचे खेळणे अशक्य आहे.
IND vs AUS मालिका २२ सप्टेंबरला मोहाली येतून सुरू होतेय. त्यानंतर २४ सप्टेंबरला दुसरी वन डे इंदूर आणि २७ सप्टेंबरला तिसरी वन डे राजकोट येथे होईल. ही मालिका संपल्यानंतर, भारतीय संघ ८ ऑक्टोबरला चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर वर्ल्ड कप स्पर्धेच्या मोहिमेला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून प्रारंभ करेल. त्याआधी भारताचे नेदरलँड्स आणि इंग्लंडविरुद्ध सराव सामने आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महामुकाबला अहमदाबादमध्ये १४ ऑक्टोबरला होणार आहे.