Naturals Ice Cream : 'जिद्द आणि चिकाटी असेल तर परिस्थितीवर मात करता येते', हे रघुनंदन श्रीनिवास कामथ यांनी सिद्ध करून दाखवले. कर्नाटकातील एका छोट्याशा गावातून मुंबईत आलेल्या कामथ यांनी शून्यातून विश्व निर्माण करत 'नेचुरल्स आइस्क्रीम' हा भारतातील सर्वात मोठा 'कस्टमर एक्सपिरियन्स' ब्रँड उभा केला. अवघ्या ४ कर्मचाऱ्यांपासून सुरू झालेला हा प्रवास आज ४०० कोटींच्या टर्नओव्हरपर्यंत पोहोचला आहे.
मुंबईत एन्ट्री आणि व्यवसायाचा श्रीगणेशा
कर्नाटकातील पुत्तूरमधील फळविक्रेत्याचे चिरंजीव असलेले कामथ उदरनिर्वाहासाठी मुंबईत आले. सुरुवातीला त्यांनी आपल्या भावाच्या दाक्षिणात्य हॉटेलमध्ये काम सुरू केले. मात्र, स्वतःचे काहीतरी वेगळे करण्याची जिद्द त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. १४ फेब्रुवारी १९८४ रोजी जुहू येथे केवळ २०० चौरस फुटांच्या खोलीत त्यांनी 'नेचुरल्स'ची पायाभरणी केली. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी त्यांनी सुरुवातीला पावभाजी विकली आणि त्यासोबत 'साईड डिश' म्हणून आइस्क्रीम देण्यास सुरुवात केली.
अस्सल चव आणि 'नो' आर्टिफिशिअल कलर
कामथ यांच्या यशाचे सर्वात मोठे गुपित म्हणजे त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता. वडिलांकडून फळे निवडण्याची कला आणि आईकडून मिळालेले संस्कार यांची सांगड घालत त्यांनी केवळ फळे, दूध आणि साखर या तीनच घटकांचा वापर करून आइस्क्रीम बनवले. बाजारातील इतर कंपन्यांप्रमाणे त्यांनी कृत्रिम रंग किंवा फ्लेवर्सचा वापर केला नाही. पहिल्याच वर्षी त्यांनी ५ लाख रुपयांची कमाई केली. त्यानंतर पावभाजी बंद करून त्यांनी पूर्णतः आइस्क्रीमवर लक्ष केंद्रित केले.
२ टन ते ४०० कोटींचे साम्राज्य
आज 'नेचुरल्स'ची व्याप्ती भारतभर पसरली आहे. आर्थिक वर्ष २०२४ मध्ये कंपनीची उलाढाल सुमारे ३८० कोटी रुपयांच्या घरात पोहोचली आहे. आज देशभरात १३५ हून अधिक आऊटलेट्स आहेत. दररोज २० टनांहून अधिक आइस्क्रीमची विक्री होते. 'मँगो पिकल'ला 'वाईल्ड आम' असे नाव देऊन त्यांनी ग्राहकांच्या पसंतीस उतरणारे २० हून अधिक फ्लेवर्स बाजारात आणले.
वाचा - सोन्या-चांदीची चमक ओसरली! सर्वोच्च स्तरावरून दरात मोठी घसरण; आता नफा कमावण्याची वेळ?
एक युगाचा अंत
नेचुरल्स आइस्क्रीमला जागतिक स्तरावर नेणारे रघुनंदन कामथ यांचे मे २०२४ मध्ये वयाच्या ७० व्या वर्षी निधन झाले. आज त्यांचा मुलगा सिद्धांत आणि श्रीनिवास हा वारसा समर्थपणे पुढे चालवत आहेत. जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च न करता केवळ 'माऊथ पब्लिसिटी' आणि गुणवत्तेच्या जोरावर त्यांनी उभे केलेले हे साम्राज्य नवीन उद्योजकांसाठी एक दीपस्तंभ आहे.
