"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका
By राकेश कदम | Updated: April 4, 2024 18:09 IST2024-04-04T18:06:45+5:302024-04-04T18:09:05+5:30
बळीराजा मेटाकुटीला आणले. खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही. पीक विमा मिळत नाहीये, अशी टीका काँग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.

"भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या मूळावर उठले", आमदार प्रणिती शिंदे यांची टीका
भाजपने मागील दहा वर्षात देशाचा कणा असलेला बळीराजा मेटाकुटीला आणले. खतांचे भाव वाढवले, दुधाला भाव नाही. पीक विमा मिळत नाहीये, अशी टीका काँग्रेसच्या साेलापूर लाेकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी केली.
आमदार शिंदे गुरुवारी मंगळवेढा तालुक्यातील गावभेट दाैऱ्यावर आहेत. प्रणिती शिंदे म्हणाल्या, आज महागाई प्रचंड वाढली आहे. इंधनाचे दर वाढल्याने शेतीची मशागत करणे परवडत नाही. खते महागली आहेत. त्यात शेतमालास हमीभाव नाही, दुधाला योग्य दर नाही. त्यामुळे शेतकरीराजा हवालदिल झाला आहे. मंगळवेढ्यात पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. असा अनेक समस्या असताना हे लोकं निवांत सत्तेची मजा घेत आहे. यांना जनतेच्या समस्येचे काहीच पडलेले नाही. आज शेतकऱ्यांनी आंदोलन केली तर ती दाबली जातात. त्यांची गळचेपी केली जाते. भाजप काम करत नाही. यांच्याकडे विकासाबद्दल सांगण्यासारखं काही नाही. हे फक्त आश्वासन देतात. मागील १० वर्षात त्यांनी फक्त खोटी आश्वासने देऊन मते घेतली. यंदा देखील हेच षडयंत्र रचले जात आहे. आज लोकशाही वाचवणे काळजी गरज आहे. यामुळे काँग्रेसला निवडून द्या, असे आवाहन यावेळी प्रणिती यांनी केले.
प्रणिती यांनी आज बठाण, उचेगाव, धर्मगाव, ढवळस, शरदनगर देगाव, घरनिकी, महमदाबाद, डोंगरगावाला भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत साळे, काँग्रेसचे जिल्हा कार्यध्यक्ष नंदकुमार पवार, दिलीप जाधव, दादा पवार, अमोल म्हमाणे, महिला तालुकाध्यक्षा जयश्री कवचाळे, शिवशंकर कवचाळे, पांडुरंग मेहरकर, सैपन शेख, बापू अवघडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.