Maharashtra Assembly Election 2019 : जयंतराव, निवडणूक तुमच्या हाताबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 15:07 IST2019-10-17T15:03:05+5:302019-10-17T15:07:25+5:30
विधानसभा निवडणुकीत मॅनेज करून मते खायचा प्रयत्न असेल, तर एक माणूस मॅनेज कराल, जनता मॅनेज होणार नाही. निवडणूक तुमच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे जयंतराव, ही निवडणूक तुम्हाला सोपी नाही. गौरव नायकवडी हे कालचं पोरगंच तुम्हाला अस्मान दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला.

Maharashtra Assembly Election 2019 : जयंतराव, निवडणूक तुमच्या हाताबाहेर
इस्लामपूर : विधानसभा निवडणुकीत मॅनेज करून मते खायचा प्रयत्न असेल, तर एक माणूस मॅनेज कराल, जनता मॅनेज होणार नाही. निवडणूक तुमच्या हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे जयंतराव, ही निवडणूक तुम्हाला सोपी नाही. गौरव नायकवडी हे कालचं पोरगंच तुम्हाला अस्मान दाखवेल, असा इशारा शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिला.
इस्लामपूर मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गौरव नायकवडी यांच्यासाठी येथील यल्लम्मा चौकात झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. यावेळी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, खासदार धैर्यशील माने, खासदार संजयकाका पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, निवेदिता माने यांची प्रमुख उपस्थिती होती.
ठाकरे म्हणाले की, मला शेतीतील काही कळत नसले तरी, माझे शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रूंशी नाते आहे. महायुतीचे सरकार आल्यानंतर शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्त करणार आहे. अल्पभूधारक शेतकरी मजुरांना वर्षाला दहा हजार देणार आहे. तीनशे युनिटच्या वीज वापर बिलात तीस टक्क्यांची कपात करू. सुशिक्षित बेरोजगारांना शासनाची शिष्यवृत्ती देणार आहोत. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या कर्तृत्वाला साजेसे स्मारक उभारणार आहोत.
सदाभाऊ खोत म्हणाले की, वाळवा तालुक्यात भगवे वादळ उठले आहे. त्यामुळे गौरव नायकवडी यांच्यासाठी आम्ही सगळे मिळून कामाला लागलो आहोत. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख, नगरसेवक शकील सय्यद, नगरसेवक बाबासाहेब सूर्यवंशी, वैभव शिंदे, विक्रम पाटील, पृथ्वीराज पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. माजी आमदार भगवानराव साळुंखे, प्रकाश शेंडगे, राहुल महाडिक, भीमराव माने उपस्थित होते.