उन्हाळ्यात शरीर पटकन थकायला लागतं, घामामुळे पाण्याची आणि उर्जेची कमतरता जाणवते. थकवा वाढतो आणि असं वाटतं की काहीच करु नये फक्त झोप काढावी. पण हा त्रास फक्त उष्णतेमुळे होत नाही तर घामासोबत शरीरातील पोषणही कमी झाल्यामुळे होतो. अशा वेळी सातू आणि गुळाचे पाणी हा अतिशय सोपा, घरगुती आणि आरोग्यदायी उपाय ठरतो. (Summer Special Recipe - Drink this water of satu and jaggery every day in summer, healthy food)ग्रामीण भागात तर हे पेय अनेक वर्षांपासून नैसर्गिक एनर्जी ड्रिंक म्हणून वापरलं जातं. हे शरीराला थंडावा देतं, ताकद वाढवतं आणि दिवसभर ताजेतवाने ठेवतं. शिवाय तयार करायलाही अगदीच सोपे आहे.
सातू म्हणजे भाजलेल्या चण्यांचे पीठ, ज्यामध्ये प्रथिने, फायबर आणि ऊर्जा देणारे घटक भरपूर प्रमाणात असतात. गूळ हा नैसर्गिक गोड पदार्थ असून त्यात आयर्न आणि इतर खनिजे असतात. या दोन्हींचा एकत्रित वापर केल्याने तयार होणारं पाणी केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर ठरतं. उष्णता वाढल्यावर आणि भरपूर घाम आल्यावर हे पाणी नक्की प्या.
हे पेय तयार करण्याची पद्धतही अतिशय सोपी आहे. एक ग्लास थंड पाण्यात दोन चमचे सातूचे पीठ घालून ते नीट ढवळून घ्यायचं, त्यात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्यायची. तसेच जास्तच पातळ होणार नाही याचीही काळजी घ्यायची. त्यानंतर त्यात चवीनुसार गूळ घालून तो पूर्णपणे विरघळू द्यायचा. आवडीनुसार चिमूटभर मीठ आणि थोडासा लिंबाचा रस घातला तर चव आणखी छान लागते. अशा प्रकारे काही मिनिटांत तुमचं पौष्टिक आणि थंडगार सातू-गुळाचं पाणी तयार होतं.
या पाण्याचे फायदे अनेक आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे शरीराला त्वरित ऊर्जा देतं. दिवसभराच्या कामानंतर आलेला थकवा कमी करण्यासाठी हे पेय खूप उपयुक्त ठरतं. याशिवाय, सातूमुळे पचनक्रिया सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते. गुळामुळे शरीरातील रक्तनिर्मितीला चालना मिळते आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. उन्हाळ्यात होणाऱ्या डिहायड्रेशनपासून वाचवण्यातही हे पेय प्रभावी ठरतं, कारण ते शरीरातील पाणी आणि आवश्यक खनिजांची भरपाई करतं.
तसेच, हे पाणी शरीराला आतून थंड ठेवतं, त्यामुळे उष्णतेचा त्रास कमी जाणवतो. नियमित सेवन केल्यास त्वचेलाही फायदा होतो, कारण शरीर हायड्रेट राहिल्यामुळे त्वचा अधिक तजेलदार दिसते. पोट भरते त्यामुळे भूक नियंत्रणात राहते आणि त्यामुळे वजन सांभाळण्यासही मदत होते. एकंदरीत, सातू आणि गुळाचे पाणी हे साधं, स्वस्त आणि अत्यंत गुणकारी पेय आहे. रोजच्या आहारात त्याचा समावेश केल्यास शरीर निरोगी राहण्यास आणि उन्हाळ्याचा त्रास कमी करण्यास मोठी मदत होते.
