यंदाच्या अर्थसंकल्प देशाला पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या ध्येयाकडे नेणारा - प्रकाश जावडेकर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 15:12 IST2026-02-05T15:11:48+5:302026-02-05T15:12:55+5:30
विद्यार्थी, नोकरदार, महिला, नवउद्यमी, शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार अशा सर्वच घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे

यंदाच्या अर्थसंकल्प देशाला पंतप्रधान मोदी यांच्या विकसित भारताच्या ध्येयाकडे नेणारा - प्रकाश जावडेकर
पुणे : यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या ध्येयाकडे नेणारा आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा पाया असून यातून सर्व घटकांच्या विकासाला चालना मिळेल, असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपतर्फे शहर कार्यालयात ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस प्रियंका शेडगे-शिंदे, समीर रुपदे आदी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, कर्तव्य भवनात तयार झालेला हा अर्थसंकल्प कर्तव्य भावनेतून तयार झाला आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. विद्यार्थी, नोकरदार, महिला, नवउद्यमी, शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार अशा सर्वच घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे. महाराष्ट्राला कर हस्तांतरणातून ९८ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. याहून अधिक निधीही राज्याला मिळणार आहे. रस्ते, कृषी, आर्थिक क्लस्टर्स, आरोग्यसेवा, सिंचन, कृषी ग्रामीण विकास, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, रेल्वे, मुंबई व इतर ठिकाणचे मेट्रो प्रकल्प यातून महाराष्ट्राला अतिरिक्त १२ हजार ३५५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एकूण अर्थसंकल्पातून महाराष्ट्र राज्याला एक लाख दहा हजार ६६१ कोटी रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्राला इतकी मोठी रक्कम कधीही मिळाली नव्हती,’ असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
