ते १७ खासदार कोण? जे नितीशकुमार किंवा चंद्राबाबुंचा खेळ बिघडवू शकतात, सत्तास्थापनेच्या बेरजेचे गणित...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 03:26 PM2024-06-05T15:26:37+5:302024-06-05T15:34:17+5:30

Lok sabha Power Equation : लोकसभेच्या निकालानुसार एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच एनडीए सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ या बहुमतापार आहे. मग नितीशकुमार, चंद्राबाबुंना एवढे का महत्व दिले जात आहे.

लोकसभेतील सत्तेचे गणित जुळविताना भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही गटांना कठीण जाणार आहे. नितीशकुमार आणि चंद्राबाबू नायडू जरी किंगमेकर असले तरी एखादा जरी एनडीएतून बाहेर पडला तर त्यांचा गेम बिघडविण्याची ताकद उरलेल्या १७ अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या खासदारांमध्ये आहे. हे १७ खासदार कोण जे या दोघांचाही खेळ बिघडवू शकतात, भाजपला किंवा इंडिया आघाडीला सत्तास्थापनेत मदत करू शकतात.

लोकसभेच्या निकालानुसार एनडीएला २९२ जागा मिळाल्या आहेत. म्हणजेच एनडीए सत्ता स्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ या बहुमतापार आहे. भाजपाकडे 240 तर टीडीपीकडे 16 जागा आहेत. जदयूकडे १२ खासदार आहेत. म्हणजेच या तीन पक्षांचे मिळून २६८ खासदार होतात.

एकनाथ शिंदेंची शिवसेना ७, पासवान यांचे ५, जेडीएस २ असे खासदार पकडता भाजपा या काही पक्षांच्या मदतीनेच २७२ चा आकडा सहज पार करू शकते. भाजपाकडे सध्या २० जागा जास्तीच्या आहेत.

यात जर दगाफटका झाला तर १७ अपक्ष आणि दोन्ही आघाड्यांचा भाग नसलेल्या पक्षांचे खासदार आहेत. जे केव्हाही ऑफर आली तर इकडचे तिकडे जाऊ शकतात. जदयू आणि टीडीपीचे २८ खासदार होतात. या दोघांनी जर काही गेम खेळला तर भाजपाच्या मदतीला हे अपक्ष कामी येऊ शकतात.

यापैकी काही खासदार हे काँग्रेस, एमआयएमचे असले तरी उरलेले त्यांची भूमिका बदलू शकतात. यामध्ये पप्पू यादव - अपक्ष, ओवैसी एमआयएम, चंद्रशेखर आजाद - आजाद समाज पार्टी (कांशीराम), सबरजीत सिंह खालसा - अपक्ष, अमृतपाल सिंग - अपक्ष, विशाल पाटील - अपक्ष, इंजीनियर राशिद-अपक्ष, पटेल उमेशभाई -अपक्ष, मोहम्मद हनीफा- अपक्ष, रिकी एन्ड्रयू - पीपुल्स पार्टी, रिचर्ड वानलालहमंगइहा - मिझोरम पीपुल्स मुवमेंट, हरसिमरत कौर बादल - शिरोमणि अकाली दल, पेद्दीरेड्डी वेंकट मिधुन रेड्डी - YSRCP, अविनाश रेड्डी - YSRCP, थानुज रानी - YSRCP, गुरुमूर्ती मैडिला - YSRCP, जोयंता बसुमतारी UPPL यांचा समावेश आहे.

नितीशकुमार यांनी जर एनडीए सोडली तर एनडीएच्या १२ जागा कमी होतील. म्हणजेच २८०. तरीही त्या बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्तच आहेत. जर चंद्राबाबुंनी एनडीए सोडली तर भाजपच्या १६ जागा कमी होती. म्हणजे २७६, त्याही बहुमताच्या आकड्यापेक्षा जास्त आहेत. पण जर या दोघांनीही सोडली तर भाजपाला ८ खासदारांची गरज पडू शकते.

कारण एनडीएचे २६४ खासदार होतात बहुमतासाठी भाजपाला ८ मते हवी होतात. असे झाल्यास भाजपा या १७ पैकी ८ जणांची बेगमी नक्कीच करू शकते. विशाल पाटील हे काँग्रेसचे आहेत. त्यामुळे पाटील आणि ओवेसी यांना वगळले तर इतर खासदार भाजपाच्या मदतीला येऊ शकतात. किंवा हेच खासदार इंडिया आघाडीच्याही मदतीला येऊ शकतात.

एनडीए किंवा इंडिया आघाडी यापैकी जो कोणी या दोघांच्या जिवावर सत्तेत येईल त्याला तारेवरची कसरत करत, कधीही दगाफटका होण्याची शक्यता गृहीत धरत सरकार चालवावे लागणार आहे. कारण नितीशकुमार हे प्रचंड महत्वाकांक्षी आहेत, वातावरण फिरत असल्याचे किंवा त्यांना वाटले की इथे राम नाही की ते कधीही पलटी मारू शकतात. असे केल्याचा अनुभव दोन्ही आघाड्यांनी जवळपास ८ ते ९ वेळा घेतलेला आहे.