'रायबरेली' मतदारसंघात भाजपा टाकणार मोठा डाव; १९ एप्रिलची वाट का पाहतायेत?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 17, 2024 05:12 PM2024-04-17T17:12:58+5:302024-04-18T10:29:07+5:30

भाजपाकडून उत्तर प्रदेशातील रायबरेली इथं मोठा डाव आखण्याच्या तयारी सुरू आहेत. आतापर्यंत रायबरेलीत ज्या नावांची चर्चा होती त्या कुणालाही अद्याप उमेदवारी मिळाली नाही. सूत्रांनुसार, भाजपा या जागेवर एका बड्या नेत्याला लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकते अशी चर्चा आहे.

मागील आठवड्यात भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक झाली. यावेळी रायबरेली जागेबाबतही चर्चा झाली. या जागेवर काँग्रेसकडून उमेदवारी घोषित झाल्यानंतरच भाजपा इथं आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. सध्या रायबरेली इथं भाजपा त्याच रणनीतीनं काम करत आहे तसं मागील वेळी अमेठीत केले होते.

भाजपाने रायबरेली मतदारसंघात न केवळ मजबूत उमेदवार उतरवण्याचं ठरवलं आहे तर ही जागा जिंकण्यासाठी भाजपाने निवडणुकीत सर्व समीकरण एकत्रित करण्यासाठी प्रयत्नही सुरू केलेत. त्यामुळे अद्याप या जागेवर भाजपानं उमेदवाराची घोषणा केली नाही.

आतापर्यंत जितके संभाव्य उमेदवार असू शकतात, ज्यांच्या नावाची चर्चा आहे त्यापैकी कुणालाही उमेदवारी दिली गेली नाही. अमेठीप्रमाणे रायबरेली मतदारसंघात जिंकण्यासाठी भाजपाच्या रणनीतीकारांनी योजना आखली आहे. त्यासाठी एखादा बडा नेता या जागेवर निवडणुकीसाठी उभा केला जाऊ शकतो.

रायबरेली इथं विजय मिळवण्यासाठी भाजपाकडून सर्व समीकरणे ध्यानात ठेवली जात आहेत. त्यात स्थानिक उमेदवारापासून भाजपा तयारी करत आहे. परंतु आवश्यकता भासल्यास रायबरेली मतदारसंघात कुठल्याही राज्यातील एक मोठा नेता या निवडणुकीच्या मैदानात उतरवू शकतो.

सूत्रांनुसार, मागील आठवड्यात भाजपाची एक महत्त्वाची बैठक पार पडली. त्यात रायबरेली मतदारसंघात भाजपा मजबूत उमेदवाराची चाचपणी करत आहे. रायबरेली जागेवर कुठलाही डमी अथवा कमकुवत उमेदवार पक्षाकडून दिला जाणार नाही याची काळजी वरिष्ठ नेतृत्व घेत आहे.

रायबरेलीत भाजपा सर्व तयारी करत आहे. तरीही काँग्रेस येथून कुणाला उमेदवारी देते यावर भाजपाचं लक्ष आहे. लवकरच भाजपा रायबरेली आणि केसरगंज येथील उमेदवारांच्या नावाची घोषणा करेल. रायबरेलीत विरोधी पक्षाचा उमेदवार पाहून भाजपा त्यांचा उमेदवार जाहीर करेल असं बोललं जातं.

रायबरेली आणि अमेठी या जागांवर काँग्रेस दिर्घ चर्चा करून उमेदवारांची निवड करणार आहे. गांधी कुटुंबाचं वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात नक्कीच चुरशीची लढाई पाहायला मिळणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर दोन्ही प्रमुख पक्ष या मतदारसंघातून उमेदवारांची घोषणा करू शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात.

गेली अनेक वर्ष रायबरेलीचं नेतृत्व सोनिया गांधी यांनी केले. परंतु आता सोनिया गांधी राज्यसभेवर निवडून गेल्यात त्यामुळे रायबरेली इथं काँग्रेस कुणाला तिकीट देणार याची चर्चा आहे. मध्यंतरी या जागेवर प्रियंका गांधींना रिंगणात उतरवलं जाईल असंही बोललं जाते.

दरम्यान, आम्ही पूर्ण तयारी केली असून आता लवकरच उमेदवार कोण असेल याची उत्सुकता संपेल. २० एप्रिलपर्यंत संयम राखावा. रायबरेलीतील जनतेला चांगली बातमी मिळेल असा दावा जिल्हा काँग्रेस अध्यक्ष पंकज त्रिपाठी यांनी केला आहे.